औरंगाबाद - कच्चा कैदी असलेल्या योगेश राठोड याचा हर्सूल कारागृहात संशयास्पद मृत्यू झाला. त्याचा खून झाल्याचा आरोप करत संशयितांना अटक करण्याच्या मागणीसाठी संतप्त नातेवाइकांनी दुसऱ्या दिवशीही सोमवारी (ता. 21) घाटी रुग्णालय परिसरात ठिय्या दिला. त्यामुळे 48 तासांनंतरही नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला नव्हता.
राठोड या तरुणाचा न्यायालयीन कोठडीत असताना हर्सूल कारागृहात मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त नातेवाइकांनी रविवारी ठिय्या देत जबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हा नोंदविण्यासोबतच अन्य मागण्या लावून धरल्या. या प्रकरणात कारागृहातील अधिकारी; तसेच जबाबदार असलेल्यांवर खुनाच्या गुन्ह्याची नोंद झाली; मात्र यावरही नातेवाइकांचे समाधान झाले नाही. त्यांनी पुन्हा सोमवारी सकाळपासून ठिय्या दिला.
सुमारे दोनशेपेक्षा अधिक जण घाटी रुग्णालयाच्या शवागृहासमोर ठिय्या मांडून होते. योगेशच्या मृत्यूला जबाबदार व्यक्तींविरुद्ध खुनाच्या गुन्ह्याची नोंद केली; पण त्यांना अटक करावी, यासह अन्य मागण्यांसाठी त्यांनी आंदोलन सुरूच ठेवले.
|