महापौर दालनात पाण्यासाठी ठिय्या

औरंगाबाद - हनुमाननगर भागातील महिलांनी सोमवारी पाण्यासाठी महापौरांच्या दालनात दोन तास ठिय्या आंदोलन केले.
औरंगाबाद - हनुमाननगर भागातील महिलांनी सोमवारी पाण्यासाठी महापौरांच्या दालनात दोन तास ठिय्या आंदोलन केले.

औरंगाबाद - पाइपलाइनचे मंजूर असलेले काम सुरू होत नसल्यामुळे हनुमाननगरात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वारंवार मागणी करूनदेखील प्रशासन दखल घेत नसल्याने सोमवारी (ता. १५) संतप्त महिलांनी महापौर नंदकुमार घोडेले यांच्या दालनात दोन तास ठिय्या आंदोलन केले. ता. एक नोव्हेंबरपर्यंत काम सुरू करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर महिलांनी माघार घेतली. 

शहरातील पाण्याचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. अनेक भागांत चार ते पाच दिवसांनंतरही पाणी येत नसल्याने संतप्त नागरिक आंदोलन करीत आहेत. दोन दिवसांपूर्वी शहागंज येथील पाण्याच्या टाकीवर नागरिकांनी ठिय्या दिला होता. त्यानंतर सोमवारी हनुमाननगरातील सुमारे शंभर ते दीडशे महिलांनी महापालिकेत धाव घेत महापौरांच्या दालनात आंदोलन केले.

हनुमाननगर भागात निम्म्या वॉर्डाला कमी दाबाने पाणी येते. त्यामुळे नवी पाइपलाइन टाकण्याचे काम मंजूर करण्यात आले आहे; मात्र अद्याप कामाला सुरवात करण्यात आलेली नाही. नगरसेवक आत्माराम पवार यांच्याकडे तक्रारी केल्यानंतरही प्रशासनामार्फत दखल घेतली जात नसल्याने महिलांनी महापौरांकडे कैफियत मांडली. कंत्राटदार काम करण्यास तयार नाही, आम्हाला पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. जोपर्यंत काम सुरू होणार नाही, तोपर्यंत आम्ही दालनातून हलणार नाही, असा इशारा देत सकाळी १.३० वाजेपासून १२.३० पर्यंत दोन तास ठिय्या दिला. महापौरांनी अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, मुख्य लेखाधिकारी श्री. केंद्रे यांना बोलावून घेतले. दरम्यान, नगरसेवक आत्माराम पवारही महापौर दालनात आले. त्यानंतर महापौरांनी कंत्राटदारासोबत फोनवरून चर्चा केली. त्याने जुन्या कामांचे बिल अद्याप मिळालेले नाही, त्यामुळे काम करण्यास विलंब होत असल्याचे सांगितले. महापौरांनी मुख्य लेखाधिकाऱ्यांना कंत्राटदाराच्या एका कामाचे दहा लाख रुपयांचे बिल सायंकाळपर्यंत काढण्याचे आदेश दिले. त्यानंतर कंत्राटदाराला येत्या एक तारखेला कामाचे नारळ फोडण्याच्या सूचना कण्यात आल्या व महिलांनी माघार घेतली. या आंदोलनात सुमती जेथे, मंगल गोंडाळ, रंजना शिंदे, सुवर्णा जवरे, शारदा सोनवणे, धोंडिराम उचित, राहुल जेथे, रामेश्‍वर जाधव, अशोक बोडखे, सुनीता गोंधळे यांच्यासह असंख्य नागरिकांनी सहभाग घेतला.

भाग नेटवर्कमध्येच नाही 
हनुमाननगरचा हा भाग नेटकवर्कमध्ये नाही. त्यामुळे या ठिकाणी काम करू शकत नाही, असा खुलासा कोल्हे यांनी या वेळी केला. त्यामुळे महिला, नागरिक संतप्त झाले. त्यानंतर महापौरांनी कामाची जबाबदारी कोल्हे यांच्याकडून काढून उपअभियंता सरताजसिंग चहेल यांच्याकडे दिली.

महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने कंत्राटदार काम करण्यास तयार नाहीत. त्यामुळे मंजूर कामे होत नाहीत. अनेक ठिकाणी पाणी न येणे, दूषित पाणी अशा तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे लवकरच संपूर्ण पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेतला जाणार आहे. 
- नंदकुमार घोडेले, महापौर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com