अहमदपूर - अहमदपूर नगरपालिकेच्या वतीने शहरास पाणीपुरवठा 25 दिवसांत दिवसाला एक वेळा होत आहे. अपुऱ्या पाणीपुरवठ्याने नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. परिणामी पाणीपुरवठा करणाऱ्या टॅंकरची संख्या वाढली आहे.
नगरपालिकेने प्रत्येक व्यक्तीस दररोज सत्तर लिटर पाणीपुरवठा करणे अपेक्षित आहे. शहराची लोकसंख्या जवळपास पन्नास हजार आहे. त्यानुसार नगरपालिका शहरास दररोज पस्तीस लाख लिटर पाणीपुरवठा करणे गरजेचे असताना फक्त दहा लाख लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो.
गरज व पुरवठा यामध्ये मोठी तफावत असल्याने पाणी विकत घेणे अपरिहार्य झाले आहे. शहरात एक हजार लिटर ते पाच हजार लिटर क्षमतेच्या टॅंकरद्वारे शंभर रुपये ते पाचशे रुपयेप्रमाणे पाणी विक्री होत आहे. शहर परिसरात जलस्रोतही कोरडे पडले आहेत. मोजक्या ठिकाणी टॅंकर भरून देणे सुरू असल्याने पाणीपुरवठा करणारे टॅंकरही सध्या रांगेत उभे आहेत.
|