औरंगाबाद - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी (ता. 14) बुलडाणा दौऱ्यावर असताना त्यांची तब्येत अचानक बिघडली. त्यामुळे त्यांना तातडीने हेलिकॉप्टरने औरंगाबादला आणण्यात आले. विमानतळाच्या व्हीआयपी कक्षातच डॉक्टरांनी तपासणी केली. अर्धा तास विश्रांती घेतल्यानंतर नारळपाणी घेऊन मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने मुंबईकडे रवाना झाले.
मुख्यमंत्री आज बुलडाणा दौऱ्यावर असताना, वाशीम येथे त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. बुलडाणा येथील कार्यक्रम आटोपून ते वाशीमला जाणार होते. मात्र बुलडाणा येथे कार्यक्रमातच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर वाशीमची सभा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुख्यमंत्र्यांना तातडीने औरंगाबादला हलविण्यात आले. दुपारी पावणेतीनच्या सुमारास ते हेलिकॉप्टरने औरंगाबाद चिकलठाणा विमानतळावर आले. तत्पूर्वी घाटी रुग्णालयाचे डॉक्टरांचे पथक सज्ज ठेवण्यात आले होते. विमानतळाच्या व्हीआयपी कक्षात त्यांची डॉक्टरांनी तपासणी केली. रक्तदाब नियंत्रणात असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे अर्धा तास विश्रांती घेऊन मुख्यमंत्री मुंबईकडे रवाना झाले.
|