साहित्याची वारी आजपासून गोरोबाकाकांच्या दारी

Osmanabad News
Osmanabad News

संत गोरोबाकाका साहित्यनगरी (उस्मानाबाद) : मराठवाड्यात पंधरा वर्षांनी, तर उस्मानाबादेत पहिल्यांदाच होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी संत गोरोबाकाकांची नगरी सज्ज झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली जय्यत तयारी पूर्ण झाली असून, साहित्यिकांसह साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे आगमन होऊ लागले आहे.

कविवर्य पद्मश्री ना. धों. महानोर यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. दहा) दुपारी चारला संमेलनाचे उद्‌घाटन होईल आणि साहित्याची ही वारी 12 जानेवारीपर्यंत गोरोबाकाकांच्या दारी असेल. यंदाचे हे 93 वे संमेलन आहे. 

यजमानपद जाहीर झाल्यापासून येथे संमेलनाची जोरदार तयारी सुरू होती. जिल्हाभरात संमेलनाच्या जागृतीसाठी उपक्रम राबविण्यात आला. शहरातील मुख्य रस्त्यावरील अनेक कार्यालयांसह बंगल्याच्या संरक्षक भिंती विविध चित्रांनी, घोषवाक्‍यांनी बोलक्‍या केल्या आहेत. त्यामुळे शहरात नवा उत्साह, जोश निर्माण झाला आहे. 

जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या मैदानावर संमेलन होत आहे. तेथे भव्य मंडप उभारण्यात आला आहे. बाराव्या शतकात संतसाहित्याची निर्मिती करणारे संत गोरोबाकाका यांनी संमेलन भरविले होते. त्यामुळे "संत गोरोबाकाका साहित्यनगरी' असे या स्थळाचे नामकरण करण्यात आले आहे. 

गोरोबाकाकांच्या तत्कालीन निवासाचा देखावा मैदानावर तयार करण्याचे काम शेषनाथ वाघ व त्यांचे सहकारी उशिरापर्यंत करीत होते. तीन मंचांवर साहित्यमेळा फुलणार आहे. त्यांनाही वेगवेगळी नावे देण्यात आली आहेत. मुख्य मंचाला शाहीर अमर शेख यांचे नाव दिले आहे. तेथे सुमारे सहा हजार जणांची बसण्याची व्यवस्था आहे. 

जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावरील मंचाला सेतुमाधवराव पगडी यांचे नाव देण्यात आले असून तेथे विविध कार्यक्रम, ग्रंथप्रदर्शन भरेल. शाळेतील दुसऱ्या मंचाला दत्तो आप्पाजी तुळजापूरकर यांचे नाव दिले आहे. तेथे कवीकट्टा रंगेल. विविध ठिकाणी प्रवेशद्वार उभारले आहेत. मुख्य प्रवेशद्वार म्हणून तुळजाभवानी मंदिराच्या महाद्वाराची प्रतिकृती साकारली आहे. बाहेरून येणाऱ्या साहित्यिकांची निवास व्यवस्था विविध हॉटेल व शासकीय विश्रामगृहात करण्यात आली आहे. 

आगमन सुरू 

संमेलनात राज्यासह देशभरातून साहित्यिक, साहित्यप्रेमी दाखल होऊ लागले आहेत. अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील, महामंडळाचे पदाधिकारी, संमेलनाचे अध्यक्ष फादर फान्सिस दिब्रिटो, मावळत्या अध्यक्षा अरुणा ढेरे, उद्‌घाटक महानोर यांच्यासह सुमारे दीडशे साहित्यिक दाखल झाले आहेत. 

मराठी भाषिकांचा हा मेळा ऐतिहासिक ठरावा, यासाठी सर्वांनी एकत्र येऊन नियोजन केले आहे. कुठेही वाद नाही. राजकीय व्यक्तींना संमेलनात फारसे स्थान नाही. केवळ मराठी भाषा, भाषेवर प्रेम करणारे साहित्यिक, लेखक आदींचा हा आनंद सोहळा यशस्वी होईल, संमेलन संस्मरणीय होईल. 
- नितीन तावडे, स्वागताध्यक्ष

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com