औरंगाबाद - राज्य सरकारच्या पणन मंडळ व बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी तारण योजना सुरू केली आहे. या योजनेचे दुसरे वर्ष सुरू झाले; मात्र या काळात औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत केवळ एकाच शेतकऱ्याने सूर्यफूल पिकावर या योजनेचा लाभ घेतला. त्यामुळे या योजनेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे.
शेतकऱ्यांचा माल तारण ठेवून कर्ज देण्याची ही योजना आहे. या योजनेचे विदर्भात सर्वाधिक लाभार्थी आहेत; मात्र मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेतला नाही. मराठवाड्यातील शेतकरी शेतमाल टप्प्याटप्प्याने विक्री करीत असल्याने तारण ठेवण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसा मालच नसल्याचे एक कारण सांगितले जाते, तर या मालावर मिळणारे कर्ज अत्यल्प आहे. तसेच बॅंकांची कर्ज प्रक्रिया अधिक सोपी असल्याने शेतकरी या योजनेकडे येत नसल्याचे औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
वर्ष 2017-18 मध्ये पळशी येथील राजू शेख यांनी त्यांचे सूर्यफुलाचे पीक तारण ठेवून 13 हजार 224 रुपयांचे कर्ज घेतले. चालू वर्ष 2018-19 मध्ये मात्र एकही शेतकरी पुढे आला नाही. बाजार समिती आणि पणन मंडळाने याविषयी बाजार समितीअंतर्गत येणाऱ्या गावांत घेतलेल्या जनजागृतीच्या कार्यक्रमांचाही उपयोग झाला नसल्याचे बाजार समितीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
तारण कर्ज योजनेचा फायदा घेण्याबाबत बाजार समितीने शेतकऱ्यांना वेळोवेळी आवाहन केले आहे. कार्यक्रमही घेतले; मात्र शेतकरी पुढे आले नाहीत. तारण कर्ज योजना चांगली असून, शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला पाहिजे.
- राधाकिसन पठाडे, सभापती
|