औरंगाबाद - चार आठवड्यांनंतर मंगळवारी सायंकाळी औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमा भागात कृत्रिम पाऊस पाडण्याच्या परिश्रमाला यश आल्याचा दावा महसूल विभागाने केला.
मराठवाड्यात कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी सोलापूरहून विमान मागविण्यात आले होते. नऊ ऑगस्ट क्रांतिदिनी विमानाने आकाशात झेपही घेतली; मात्र अपेक्षित ढग उपलब्ध नसल्याने काही वेळातच खाली उतरावे लागले. त्यानंतर हे विमान सोलापूरला परत गेल्यानंतर दोन दिवसांपूर्वी अमेरिकेतून विमान आलेले आहे. सोमवारी (ता. 19) सायंकाळपर्यंत डीजीसी क्लीअरन्सअभावी पावसासाठीचे विमान आकाशात झेप घेऊ शकले नव्हते.
सोमवारी उशिरापर्यंत क्लीअरन्सविषयी कळणे अपेक्षित होते; परंतु सोमवारनंतर मंगळवारी सायंकाळी हे विमान सोलापूरहून येत असताना नियंत्रण कक्षातून जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यांच्या सीमा भागातील हातखेडा, बेळगाव आणि भाटन गावांत अनुकूल ढग असल्याच्या सूचना मिळाल्या. त्या आधारे सायंकाळी 5:25 ते 5:46 दरम्यान बीजारोपण करण्यात आले. शिवाय या परिसरात पाऊस पडल्याच्या नोंदी आहेत, असा दावा महसूल विभागाने केला.
|