बोंडअळी नुकसानीचे पंचनामे नव्हे, प्रशासन कागदी घोडे नाचविण्यात दंग

बोंडअळी नुकसानीचे पंचनामे नव्हे, प्रशासन कागदी घोडे नाचविण्यात दंग

औरंगाबाद, जालना, बीडमधून १ लाख ५ हजार ८७८ तक्रारी, १ हजार ४६६ हेक्‍टर बाधित क्षेत्राची पाहणी
औरंगाबाद - हमीभाव मिळत नसल्याने हतबल झालेल्या शेतकऱ्यांसमोर बोंडअळीचे मोठे संकट उभे ठाकले असताना थेट पंचनामे करण्यापेक्षा प्रशासन तक्रार अर्ज मागवीत कागदी घोडे नाचवीत आहे. त्यामुळे नुकसानीची भरपाई मिळेल की नाही, असा प्रश्‍न व्यक्‍त केला जात आहे. औरंगाबाद, जालना व बीडमधून १ लाख ५ हजार ८७८ तक्रारी अर्जांपैकी १ हजार ४६६ हेक्‍टरची पाहणी करण्यात आली आहे.

काही वर्षांपूर्वी बोटावर मोजण्याइतक्‍या क्षेत्रावर बोंडअळीचा प्रादुर्भाव होत असे; मात्र जनजागरण करण्याकडे कृषी विभागाने केलेले दुर्लक्ष आणि बोगस बियाणे कंपन्यांवर दाखविलेली मेहेरबानीच याला कारणीभूत ठरली आहे. जाणकारांच्या मते कधी नव्हे एवढे ७० टक्‍क्‍यांच्या आसपास क्षेत्र बोंडअळीने बाधित झाले आहे. एक तर घोषणा करूनही हमीभाव दिला जात नाही.

दुसरीकडे उत्पादन मोठ्या प्रमाणात घडले आहे. या दुहेरी संकटात शेतकरी सापडल्यामुळे दुष्काळासारख्याच स्थितीत शेतकरी अडकला आहे. काही दिवसांपूर्वी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आढावा बैठकीत बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे तक्रारी लिहून घ्या, असा आदेश दिला होते. दरम्यान, १८१ ठिकाणी बोंडअळींबाबत भेटी दिल्याचे सांगितले होते; मात्र संख्या आता मोठी असल्याचे समोर आले आहे. 

याबाबत सोमवारी (ता. चार) विभागीय आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या दालनात बैठक झाली. भापकर म्हणाले, की शेतकऱ्यांकडून कृषी सहायक बोंडअळीबाबत तक्रारी घेत आहेत. त्यानंतर शास्त्रज्ञांना सोबत घेऊन जिल्हास्तरीय समिती पाहणी करणार आहे. ही समिती जे सांगितले तेच बियाणे वापरल्याची खात्री करून घेईल. त्यानंतर नुकसानीबाबत कृषी आयुक्‍तांना कळविण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले; मात्र प्रत्यक्षात ही सर्व प्रक्रिया वेळखाऊ असणार आहे. त्यामुळे नुकसानभरपाई मिळेल की नाही, मिळाली तर किती मिळेल, असे प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. कर्जमाफीचा मोठा वाईट अनुभव पाठीशी असल्याने बोंडअळीच्या पंचनाम्याऐवजी अन्य प्रकारचे कागदी घोडे नाचविण्यात येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्‍त होत आहे. 

एक एकरामध्ये दहा ते पंधरा क्विंटल कापूस होत असे; मात्र यंदा बोंडअळीमुळे दोन क्विंटलचा उतारही येतो की नाही, अशी भीती आहे. त्यामुळे एक तर हमीभाव द्यायला तयार नाहीत. दुसरीकडे बोंडअळीने उत्पन्नाची वाट लागली. गुजरातचा डंका वाजविणाऱ्या या सरकारची कापसाला गुजरातप्रमाणे बोनस देण्याची नियतही दिसत नाही. त्यामुळे नुकसानीची किती भरपाई मिळेल, याबद्दल शंकाच आहे.
- गणेश टेकाळे, शेतकरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com