औरंगाबादच्या विमान उड्डाणाला ‘स्लॉट’ची प्रतिक्षा

Aurangabad Airport still waiting for companies slot
Aurangabad Airport still waiting for companies slot

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये देशांतर्गत पर्यटन, उद्योग आणि व्यवसाय वाढीसाठी विमानांची संख्या वाढवून राजस्थान दिल्ली आणि मुंबईकडे एअर कनेक्टिविटी बळकट करण्याच्या मागणीसाठी टूर ऑपरेटर, उद्योजक आणि व्यावसायिकांचे शिष्टमंडळ दिल्लीमध्ये आहे. या शिष्टमंडळाची तीन विमान कंपन्यांसोबत सलग तिसरी बैठक पार पडली. औरंगाबादेतून नव्या विमानसेवा सुरू करण्यास विमान कंपन्या तयार असल्या तरीही दिल्ली आणि मुंबई विमानतळांच्या कंपन्यांकडून स्लॉट मिळाल्यानंतरच विमानसेवा सुरू होणार असल्याची माहिती मंगळवारी (ता. 30) झालेल्या बैठकीतून समोर आली. 

याबाबत अधिक माहिती देतांना शिष्टमंडळाचे नेतृत्त्व करीत असलेले सुनित कोठारी म्हणाले की, औरंगाबादमधून राजस्थान, दिल्ली आणि मुंबई विमान कनेक्टिविटी वाढविण्यासंदर्भात आम्ही मागील तीन महिन्यांपासून विमान कंपन्यांकडे पाठपुरावा करतोय. याच श्रृंखलेतील भाग म्हणून दिल्लीत मंगळवारी तीन विमान कंपन्यांशी बैठक झाली. यादरम्यान विमानसेवा सुरू करण्यासाठी येणाऱ्या अडचणी आणि त्या कशाप्रकारे सोडविता येतील यावर सखोल चर्चा झाली. 

औरंगाबादेतून विमानसेवा सुरू करण्यासाठी येणाऱ्या बहुतांश अडचणी आता दूर झाल्या असल्या तरीही दिल्ली आणि मुंबईच्या एअरपोर्ट कंपन्यांकडून अद्याप स्लॉट (विमान उड्डाणासाठी वेळ) मिळालेला नाही. हा स्लॉट मिळाल्याबरोबर विमान कंपन्यांनी औरंगाबादसाठी विमान राखीव ठेवलेले असून लगेचच विमानसेवा सुरू करता येणार आहे. त्यासाठी विमानकंपन्या, पर्यटन उद्योगातील व्यावसायिक आणि लोकप्रतिनिधी सातत्याने पाठपुरावा करीत असून लवकरात लवकर औरंगाबाद राजस्थान, दिल्ली आणि मुंबईशी जोडले जाईल, असा विश्वास कोठारी यांनी व्यक्त केला. 

या शिष्टमंडळात उद्योजक सुनित कोठारी यांच्यासह कॉक्स अँड किंग कंपनीचे सरव्यवस्थापक तरुण खुल्लर, इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटरचे अध्यक्ष प्रणव सरकार, उपाध्यक्ष राजीव मेहरा आणि औरंगाबाद टूरिज्म डेव्हलपमेंट फोरमचे अध्यक्ष जसवंत सिंह राजपूत यांची उपस्थिती होती. 

डिस्कव्हर इंडिया फेअरसाठी पाठपुरावा सुरूच
परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी प्रवासात सूट मिळत असलेली डिस्कव्हर इंडिया फेअर ही योजना पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. पर्यटकांची संख्या वाढविण्यासाठी ही योजना नक्कीच फायद्याची ठरू शकेल. 15 ते 21 दिवसांसाठी ही योजना सुरू करण्याचा विचार केला जाईल. ही योजना पुन्हा सुरू झाल्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या संख्येत नक्कीच वाढ होईल. त्याशिवाय औरंगाबादचा समावेश बुद्धिस्ट सर्किटमध्ये करण्यात यावा अशीही मागणी शिष्टमंडळाने लावून धरली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com