शेतकऱ्यांची कर्जमाफी फसवीचः सुनील तटकरे

शेतकऱ्यांची कर्जमाफी फसवीचः सुनील तटकरे

औरंगाबाद: शेतकऱ्यांची कर्जमाफी ही योजनाच फसवी आहे. तीन महिन्यापूर्वी घेतलेला निर्णय आजपर्यंत पुर्णत्वास गेला नाही. पात्र, अपात्र याबाबत काहीही माहिती दिली जात नाही, त्यामुळे आजही गोंधळ कायम असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांबाबत येत्या पाच नोव्हेंबरला येथे किसान सेलची महत्वपूर्ण बैठक होईल. त्यात पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

नांदेड-वाघाळा महापालिकेच्या निवडणुक प्रचाराला निघण्यापूर्वी बुधवारी (ता. चार) सायंकाळी श्री. तटकरे यांनी राष्ट्रवादी भवन येथे पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, की शिवसेनेने काही दिवसांपुर्वी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात हवा निर्माण केली होती. दसरा मेळाव्यात काहीतरी होईल, असे वाटले होते. मात्र, फुसका बार निघाला. मंत्रीमंडळात शेजारी बसून निर्णय घ्यायचे आणि बाहेर आले की त्याविरुद्ध बोलायचे. हा दुटप्पीपणाच आहे. त्यांच्याकडे बाणेदारपणा असता तर मंत्रीमंडळ बैठकीतच बोलले असते. ज्या सोशल मिडीयाच्या जीवावर भाजपा सत्तेत आले, त्या सोशल मिडीयात काही दिवसांपासून तीव्र संताप व्यक्‍त होत आहे. आपली कामगिरी आपल्याच अंगलट येत असल्यानेच नोटीसा पाठविण्याचे कामही सत्ताधारी करीत आहेत. कर्जमाफीच्या निर्णयाबाबत सत्ताधारी प्रामाणिक असते तर आत्तापर्यंत अर्जाची छानणी केली असती. मात्र, त्यांना काहीही घेणेदेणे नसल्यामुळेच त्यांनी या विषयावरुन गोंधळ घातला आहे. शेतकऱ्यांना बोगस म्हणणारी प्रवृत्ती घातक असून ही सत्तेची गुर्मी आहे. दिवाळीपुर्वी कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, विजेची मागणी आणि पुरवठा आम्ही शून्यावर आणली होती. मात्र, नियोजन शुन्य कारभारामुळे लोडशेडिंग केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी आमदार सतीश चव्हाण, शहराध्यक्ष काशिनाथ कोकाटे, सुरजितसिंग खुंगर उपस्थित होते.

सिंचनाच्या चौकशीतून सत्य बाहेर यावे
सिंचन घोटाळ्याबाबत आपल्याला कितीवेळा बोलावले, असे विचारले असता, तीन वर्षापूर्वी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार व आपणास बोलावले होते. चौकशी पुर्ण होईपर्यंत आम्ही सहकार्य करणार असून सत्य बाहेर यावे, हीच आमची अपेक्षा असल्याचेही श्री. तटकरे यांनी स्पष्ट केले.

राणेंच्या पक्षामुळे कॉंग्रेसलाच फटका
नारायण राणे यांनी स्वतंत्र पक्षाची स्थापना केल्यामुळे कॉंग्रेसलाच फटका बसेल. ते माझे चांगले मित्र असून राजकीय निर्णय घेण्यापूर्वी माझ्याशी चर्चा करतात. मात्र, त्यांना सल्ला देण्याइतपत मी मोठा नसल्याचे श्री. तटकरे यांनी म्हटले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com