शांघाई ऑटोमोटिव्हची पावले औरंगाबादच्या दिशेने

शांघाई ऑटोमोटिव्हची पावले औरंगाबादच्या दिशेने

प्रकल्प खेचून आणण्यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न, उद्योगमंत्र्यांची माहिती

औरंगाबाद - चीनची वाहन निर्मिती क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या शांघाई ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री कॉर्पोरेशन (एसएआयसी) या कंपनीला औरंगाबादेत आणण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. 

ऑटो इंडस्ट्री हब असलेल्या औरंगाबादेत आता आणखी एका मोठा ऑटोमोबाईल उद्योग येण्याची चिन्हे आहेत. शांघाई ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री कॉर्पोरेशन अर्थात एसएआयसी ही २०२० पर्यंत जगातील मोठ्या ऑटोमोबाईल कंपन्यांपैकी एक राहणार आहे. १०० बिलियन डॉलर्सचे उत्पन्न असलेल्या या कंपनीने भारतीय बाजारात येण्याची तयारी चालवली आहे. एमजी (मोरिस गॅरेजस) मोटर्स इंडिया या ब्रॅंडच्या माध्यमातून एसएआयसी भारतात आपले उत्पादन करणार आहे. ब्रिटिश मूळ असलेला हा १९२४ मध्ये स्थापन करण्यात आलेला ब्रिटिश ब्रॅण्ड २००८ मध्ये एसएआयसीने खरेदी केला होता. भारतात या कंपनीला मोठ्या प्रमाणावर सवलती देण्यात येणार असून कंपनीतर्फे २०१९ पर्यंत उत्पादनाची तयारी सुरू करण्यात आली आहे. पर्यावरणाला पूरक अशा गाड्यांची निर्मिती भारतात करणार असल्याची घोषणा कंपनीतर्फे करण्यात आली आहे.

देशातील स्पर्धा वाढणार 
एसएआयसीतर्फे देशात इलेक्‍ट्रिक कारची निर्मिती केली जाण्याची चिन्हे आहेत. ज्यांची स्पर्धा सध्या भारतीय कार बाजारावर अधिराज्य गाजवणाऱ्या कंपन्यांशी राहणार आहे. या उद्योगांमुळे विद्यमान कार्यरत कंपन्यांना आपल्या जागा शाबूत ठेवण्यासाठी पावले टाकावी लागण्याची शक्‍यता आहे ज्यामुळे त्यांच्या नफ्यातही घट होऊ शकतो. यामुळे भारतीय बाजारात काम करण्यासाठी उद्योगांना वाव असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
 

राज्य सरकारची परीक्षा 
दरम्यान, मराठवाड्यात प्राधान्याने उद्योग आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगणारे मुख्यमंत्री आणि त्यांच्या यंत्रणेसाठी हा प्रकल्प प्रतिष्ठेचा ठरणार आहे. किया मोटर्स या दक्षिण कोरियन कंपनीचा उद्योग औरंगाबादेत येण्याऐवजी तेलंगानाच्या दिशेने गेला. आता एसएआयसीचा प्रकल्प औरंगाबादेत आणण्यासाठी राज्य सरकारला प्रयत्न करावे लागणार आहेत. जनरल मोटर्सचा बंद पडलेला हलोल (गुजरात) येथील प्लांटबाबतही कंपनी विचाराधिन असल्याने ही कंपनी खेचून आणणे महाराष्ट्र राज्य सरकारसाठी परीक्षेपेक्षा कमी राहणार नाही.

अनेक कंपन्या येता येता गेल्‍या...
औरंगाबादला ऐतिहासिकपाठोपाठ औद्योगिक शहर म्हणूनही ओळखले जाते. असे असले तरी किया मोटर्ससारखा मोठा प्रकल्प हा औरंगाबादेत येता येता अन्यत्र गेला. यात याशिवाय काही जपानी कंपन्याही औरंगाबादेतून अन्यत्र गेल्या होत्या. प्रदूषण आणि पायाभूत सुविधांबांबत साशंक असलेल्या कंपन्या या कायमच विकसित शहरांकडे जातात, असा आतापर्यंतचा इतिहास आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com