औरंगाबाद - अयोध्येतील राम जन्मभूमी विरुद्ध बाबरी मशिद या वादावर श्री श्री रविशंकर यांच्याकडे कोणताही ठोस फॉर्म्यूला नाही. त्यांचे अयोध्येतील आगमन केवळ प्रसिद्धीसाठीचा स्टंट होता, असा आरोप ऑल इंडिया शिया पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते मौलाना यासुब अब्बास यांनी रविवारी (ता. 19) पत्रकार परिषदेत केला.
अब्बास म्हणाले, की अयोध्येतील राम जन्मभूमी-बाबरी मशिदीचा वाद सहा डिसेंबर आणि दर निवडणुकांपूर्वी उकरून काढण्यात येतो. अनेक वर्षांपासून हे प्रकार सुरू आहेत. हा वाद पुन्हा समोर आणून काही लोक हिंदू-मुस्लिम तंटा निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. जनतेच्या महत्त्वाच्या प्रश्नांवरून संपूर्ण देशाचे लक्ष विचलित करण्याचा हा प्रकार आहे. शिया पर्सनल लॉ बोर्डने या आधीच मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. या वादावर सर्वोच्च न्यायालय जो तोडगा काढेल तो आम्हाला मान्य राहणार आहे. हा निर्णय आम्ही विचारपूर्वक घेतला आहे. कारण या वादामध्ये चर्चा करून कोणताही तोडगा निघणार नाही, हे स्पष्ट आहे.''
श्री श्री रविशंकर यांच्याकडे तोडगा मिटविण्यासाठी कोणताही फॉर्म्यूला नव्हताच. जर तुमच्याकडे योजना नाही. मग तुम्ही अयोध्येत येण्याचे कारण काय होते, असा प्रश्न त्यांनी उपस्थितीत केला.
दरम्यान, दबावाला बळी पडून कोणतीही गोष्ट करून घेणे चुकीचे आहे. उत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रजवी यांनी व्यक्त केलेले मत वैयक्तिक आहे. त्याला मुस्लिम समाजाची मान्यता नसल्याचेही मौलाना अब्बास यांनी सांगितले.
|