औरंगाबाद - कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ बंद पुकारणाऱ्या सात ते आठ हजार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, जिवे मारण्याच्या प्रयत्न केल्याचे गंभीर कलम लावण्यात येत आहे. रा. स्व. संघाच्या दबावामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेला हा राजकीय दहशतवाद आहे. निरपराध युवक, महिलांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत; अन्यथा राज्यभरात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी सोमवारी (ता. 15) येथे पत्रकारांशी बोलताना दिला.
वाघमारे म्हणाले, की कोरेगाव भीमा प्रकरणानंतर मुख्यमंत्र्यांनी कोणावरही कारवाई केली जाणार व झालेले नुकसान सरकार भरून देईल, अशी भूमिका जाहीर केली होती. जे बोलतात ते न करणारे अशी ख्याती असलेल्या मुख्यमंत्र्यांनी नंतर राज्यभर बहुजन युवकांची धरपकड सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांत कोम्बिग ऑपरेशन राबवून आतापर्यंत सात ते आठ हजार जणांना अटक करण्यात आली आहे. त्यातील अनेकांनी कुठे तोडफोडही केलेली नाही. संघाच्या दबावामुळे सूडभावनेने ही कारवाई केली जात आहे.
मोदींमुळेच भिडे, एकबोटेंना अभय
कोरेगाव भीमाप्रकरणी गुन्हे दाखल असलेले मनोहर ऊर्फ संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांचे संघ व थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत संबंध आहेत. मोदी यांच्या आदेशामुळेच दोघांच्या विरोधात कारवाई होत नसल्याचा आरोप वाघमारे यांनी केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालय महाराष्ट्रात आहे. त्यामुळेच राज्यात वारंवार जातीय उद्रेक होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
|