औरंगाबाद - दोन चारचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दोघे जण जागीच ठार झाले, तर सहा जण गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी (ता. 22) सकाळी नाशिक रस्त्यावरील वरझडी फाट्याजवळ घडली. अमृता किशोर बुंदेलवार (32 रा. जोगेश्वरी वेस्ट, मुंबई) आणि चालक अबू आबेद अशी मृतांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रपूर येथील मूळ रहिवासी असलेले किशोर अशोक बुंदेलवार (वय 40) मुंबईत एका कन्स्ट्रक्शन कंपनीत नोकरीला आहेत. दिवाळीसाठी ते गावाकडे आले होते. चारचाकीने (एमएच 20 ईपी 4241) पत्नी अमृता आणि चालक अबू आबेद यांच्यासोबत चंद्रपूरहून ते मुंबईकडे जात होते, तर दुसऱ्या चारचाकीतून सागर तुरे हे त्यांच्या कुटुंबीयांसह येवल्याहून औरंगाबादला घरी येत होते. वरझडी फाट्यावर या दोन्ही चारचाकींची समोरासमोर धडक झाली. यामध्ये किशोर यांच्या गाडीत मागे बसलेली त्यांची पत्नी अमृता व चालक हे दोघेही जागीच ठार झाले. किशोर हेही गंभीर जखमी झाले. दुसऱ्या वाहनामधील तुरे कुटुंबातील पाच जण गंभीर जखमी झाले. सर्व जखमींवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी शिल्लेगाव पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद घेण्यात आली आहे.
|