औरंगाबाद - वरकरणी राज्यकर्ता दिसणारा मराठा समाज आज संकटात सापडला आहे. वेळेबरोबरच मराठा समाजातील अस्वस्थता वाढते आहे. हा बांध फुटण्यापूर्वी सरकारने या समाजाचे प्रश्न मार्गी लावावेत, असा सल्ला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी दिला.
शिवाई एमबीएन मराठा विकास मंडळ, मराठा समाजातील महिलांतर्फे औद्योगिक वृद्धीसाठी आयोजित राज्यस्तरीय मराठा समाज महाएक्स्पो उद्घाटनाच्या अध्यक्षीय समारोपावेळी ते बोलत होते. या एक्स्पोचे उद्घाटन भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या हस्ते झाले.
चव्हाण म्हणाले, 'आपल्या या अडचणींना वाचा फोडण्यासाठी या समाजाने औरंगाबादेतूनच क्रांती मोर्चांना आरंभ केला. कायदेशीर बाबींची तपासणी करून आम्ही आरक्षणाचा कायदा केला आणि त्याचे लाभ मिळत असतानाच नवे सरकार आले. विद्यमान सरकार प्रामाणिक प्रयत्न करीत असले तरी मराठा समाजातील अस्थिरता वाढत चालली आहे.' दानवे यांच्यासारख्या नेत्याने आपली सर्व शक्ती पणाला लावून मराठा समाजाच्या समस्या तत्काळ सोडविण्याची मागणीही त्यांनी केली.
|