औरंगाबाद-नगर रेल्वेलाइनच्या सर्वेक्षणाला मंजुरी 

Railway
Railway

औरंगाबाद - रस्त्यावरील वाढत्या ताणामुळे मराठवाड्याला सार्वजनिक वाहतुकीचा नवा मार्ग खुला होण्याची चिन्हे आहेत. "सकाळ'ने मांडलेल्या विषयाची दखल घेत रेल्वे बोर्डाने औरंगाबाद-नगर रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी दिली आहे. शिवाय औरंगाबादचा समावेश असलेल्या आणखी तीन मार्गांची सर्वेक्षणे करण्यासही बोर्डाने मान्यता दिली आहे. 

औरंगाबाद आणि पुण्यादरम्यान नवा ग्रीनफिल्ड रस्ता तयार करण्याचे काम केंद्रीय दळणवळण मंत्रालयाने हाती घेतल्यानंतर जालना ते पुणेदरम्यानच्या औद्योगिक वसाहतींना नवे आणि स्वस्त वाहतूक पर्याय म्हणून औरंगाबाद-नगर-पुणे रेल्वेलाइनचा विचार रेल्वे मंत्रालयाने करावा, अशी औद्योगिक जगताची मागणी होती. याविषयी "सकाळ'ने वाचा फोडली होती. त्यावर रेल्वे बोर्डाने सकारात्मक निर्णय घेतला असून औरंगाबाद आणि नगरदरम्यानच्या 115 किलोमीटर लाइनसाठी सर्वेक्षण करण्याला हिरवा कंदील दिला आहे. याशिवाय प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष औरंगाबादचा समावेश असलेल्या तीन रेल्वेलाइनचे सर्वेक्षण करण्याला रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली आहे. दुसरीकडे पुणे-नगर मार्गाचे सर्वेक्षणही बोर्डाने रद्द केले आहे. औरंगाबाद-नगर सर्वेक्षण मराठवाड्यासाठी दक्षिण द्वार खुले करणारे ठरू शकणार असले तरी सागरी मार्गाने निर्यात उद्योगांचे प्रश्न यातून सुटणारे नाहीत. याविषयी बोलण्यासाठी मुख्य अभियंता राजीवकुमार मिश्रा यांनी प्रतिसाद दिला नाही. 
  
गरज का? 
जालन्यातील औद्योगिक वसाहती, ड्रायपोर्ट, करमाडचा डीएमआयसी प्रकल्प, शेंद्रा वसाहत, औरंगाबाद, वाळूज, नगर, केडगाव, सुपा, रांजणगाव आदी औद्योगिक वसाहतींना दाक्षिणात्य बाजारपेठा आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टपर्यंतचा प्रवास स्वस्तात आणि वेगाने करता यावा यासाठी औरंगाबाद-नगर-पुणे रेल्वेमार्गाची गरज आहे. या माध्यमातून औरंगाबाद आणि नगरसारखी महत्त्वाची लष्करी तळेही लोहमार्गाने जोडली जाऊ शकतात. 
 
औरंगाबाद-चाळीसगाव थंड बस्त्यात 
औरंगाबाद - चाळीसगावसाठी सर्वेक्षण होऊन निम्मे दशक उलटले. मात्र, या मार्गावरील रहदारी तोट्याची ठरणार असल्याचे सांगत त्याला थंड बस्त्यात टाकले आहे. तथापि, 2015 मध्ये झालेल्या सर्वेक्षणात हा लोहमार्ग फायद्याचा सांगितलेला असताना रेल्वे बोर्डाकडे जाईपर्यंत तो तोट्याचा कसा झाला, असा सवाल मराठवाडा रेल्वे विकास समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश वर्मा यांनी केला आहे. औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहरांना लोहमार्गाने जोडण्यासाठीच्या चाचपणीसाठी उस्मानाबाद - बीड - औरंगाबाद अशा 200 किलोमीटरच्या सर्वेक्षणाला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच औरंगाबाद - बुलडाणा - खामगाव या लोहमार्गाच्या सर्वेक्षणालाही मंजुरी मिळालेली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com