कंपन्यांच्या पाणीपुरवठ्यात 20 टक्के कपात 

कंपन्यांच्या पाणीपुरवठ्यात 20 टक्के कपात 

औरंगाबाद - मार्च महिन्यातच शहरात पाण्यासाठी ओरड सुरू झाली असून, सोमवारी (ता. 19) झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाणीपुरवठ्याबाबत तक्रारी केल्या. त्यामुळे महापालिकेच्या मुख्य वाहिन्यांवरून पैठण रोडवरील सुमारे 19 कंपन्यांना होणारा पाणीपुरवठा 20 टक्‍क्‍यांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

शहरात महापालिकेतर्फे तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यासाठी पाणी कमी असल्याचे कारण दिले जाते. असे असताना दुसरीकडे मुख्य वाहिन्यांवरून 19 कंपन्या व काही ग्रामपंचायतींना रोज पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे पाणीपट्टीपोटी कोट्यवधी रुपये थकीत आहेत. सोमवारी झालेल्या सभेत पाण्याचा विषय चर्चेला येताच कंपन्यांच्या पाणी पुरवठ्यात कपात करण्याची सूचना प्रमोद राठोड यांनी केली. त्यानुसार उन्हाळ्यात शहराचा पाणीपुरवठा वाढावा, यासाठी कंपन्यांचे पाणी 20 टक्‍क्‍यांनी कमी करावे, पाणीपुरवठा विभागाकडे जे अंदाजपत्रक प्रलंबित आहेत ते तत्काळ मंजूर करावेत, नवीन रस्ते करण्यात येणार असल्याने सर्व वॉर्डांत नवीन जलवाहिनी टाकण्याचे अंदाजपत्रक तयार करण्यात यावे, आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी पाणीपुरवठा विभागाला दिले. दरम्यान, नगरसेविका, नगरसेवकांनी कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांच्यावर प्रश्‍नांची सरबत्ती केली. त्या वेळी चहल गांगरून गेले होते. वर्ष-वर्ष काम होत नसल्याचा आरोप या वेळी नगरसेवकांनी केला. 

या कंपन्यांचा समावेश 
महापालिकेच्या मुख्य वाहिन्यांवरून पैठण रोडवरील चार गावांना पाणीपुरवठा होतो. तसेच व्हिडिओकॉनच्या तीन कंपन्या, अलाना, एमईएस, बेंचमार्क, तसेच वाल्मी, छावणी परिषदेचा यात समावेश आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com