कुटुंब सोडून तुरीची राखण करण्याची शेतकऱ्यांवर वेळ

कुटुंब सोडून तुरीची राखण करण्याची शेतकऱ्यांवर वेळ

बीड : कुटुंब गावाकडे अन्‌ शेतकरी बीड बाजार समितीमध्ये, अशी शेतकऱ्यांची परिस्थिती झाली आहे. पिंपळनेरच्या शेतकऱ्यांना तूरविक्रीसाठी त्रास सहन करण्याची वेळ सरकारने आणली आहे. 

बाजार समितीत तूर आणलेले शेकडो शेतकरी मापे होत नसल्याने अडचणीत सापडले आहेत. शेतीची मशागत सोडून शेतकऱ्यांना बाजार समितीमध्ये थांबावे लागत आहे.
तूरखरेदीचे धोरण सरकारला सुरवातीपासूनच जमले नाही. त्यात व्यापाऱ्यांनी हात धुऊन घेतला.

त्यात माप वेळेवर होत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. विशेष म्हणजे शनिवारी (ता. २७) या शेतकऱ्यांमध्ये मुलींचे दहा दिवसांपूर्वी लग्न झालेले दोन वधूपिता रांगेला तूर लावून माप कधी होईल? याची वाट पाहत होते. एकीकडे लग्नाचा झालेला खर्च, लग्नामुळे राहिलेली कामे, शेतीची मशागतीची कामे, सोडून बाजार समितीत बसून तुरीची राखण करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

मार्केटिंग फेडरेशन, बाजार समिती, सहकार खात्याचे नियंत्रण न ठेवणारे अधिकारी आणि अन्य असे सर्वच याला जबाबदार आहेत. एकीकडे नाफेडच्या वतीने बारदाना आला असल्याचे सांगितले जात असले, तरी दुसरीकडे प्रत्यक्षात बारदाना उपलब्ध नसल्याने शनिवारी (ता. २७) तूर खरेदी बंद होती. यात चूक बाजार समितीची आहे की मार्केटींग फेडरेशनची? याची चौकशी होऊन दोषींवर कारवाई झाली पाहिजे, असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com