औरंगाबाद - जळगावच्या भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या (बीएचआर) संचालकांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश मंगेश एस. पाटील यांनी फेटाळून लावला आहे.
या सोसायटीने मुदत संपल्यानंतरही ठेवीवरील व्याज न देता गंडा घातल्याप्रकरणी सुरेखा तोतला एरंडोल (जि. जळगाव) यांनी 2015 मध्ये पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानंतर बीड जिह्यातील माजलगाव, औरंगाबाद, यवतमाळ यासह अन्य ठिकाणीही गुन्हे दाखल झाले आहेत.
सोसायटीचे अध्यक्ष व संचालक मंडळातील प्रमोद भाईचंद रायसोनी, सुकलाल माळी, दिलीप चोरडिया, सूरजमल जैन, भागवत माळी, भगवान वाघ, शेख रमजान शेख अब्दुल नबी, राजाराम कोळी, मोतीलाल जिरी, यशवंत जिरी, दादा पाटील, डॉ. हितेंद्र महाजन, इंद्रकुमार ललवाणी यांनी नियमित जामिनासाठी अर्ज केला होता. अर्जदार जवळपास अडीच वर्षांपासून तुरुंगात आहेत.
आतापर्यंत पुरवणी दोषारोपपत्र दाखल केलेले नसून, लेखापाल व इतर अहवालही सादर झालेले नाहीत, त्यामुळे पुढील तपास सुरू असेपर्यंत जामीन मंजूर करावा, अशी विनंती संचालकांतर्फे करण्यात आली; तर सहायक सरकारी अभियोक्ता स्वप्नील जोशी यांनी आरोपींना जामीन देण्याला जोरदार विरोध केला होता.
|