औरंगाबाद - राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने अद्याप अपूर्ण असून, ती आश्वासने वेळेत पूर्ण करावीत, यासाठी सुकाणू समितीतर्फे सोमवारी (ता. 19) राज्यभर "अन्नत्याग सत्याग्रह' करण्यात येणार आहे. त्यानंतर 23 मार्च ते 27 एप्रिलपासून राज्यभर "हुतात्मा अभिवादन शेतकरी जागर यात्रा' काढण्यात येईल, अशी माहिती समितीचे सदस्य सुभाष लोमटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शेतकऱ्यांच्या संपानंतर राज्य शासनाने सुकाणू समितीला लेखी आश्वासने दिली होती. गेल्या आठवड्यात किसान सभेने काढलेल्या लॉंगमार्चनंतर सरकारला जाग आली व पुन्हा लेखी आश्वासने देण्यात आली; मात्र ही आश्वासने पाळली जावीत, यासाठी सुकाणू समितीची मंगळवारी (ता.13) मुंबईत बैठक झाली. या बैठकीत राज्यव्यापी आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला. 19 मार्च 1986 ला यवतमाळ येथे साहेबराव करपे या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाने कुटुंबासह आत्महत्या केली होती. म्हणूनच करपे कुटुंबीयांना अभिवादन करण्यासाठी सोमवारी राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर "अन्नत्याग सत्याग्रह' करण्यात येत आहे. त्यानंतर 23 मार्च ते 27 एप्रिलपर्यंत राज्यभर "हुतात्मा अभिवादन शेतकरी जागर यात्रा' काढून स्वातंत्र्यलढ्यापासून ते आजपर्यंतच्या विविध लढ्यांत हुतात्मे झालेल्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. राज्यात 540 सभा घेऊन ही यात्रा 27 एप्रिलला पुणे येथील महात्मा फुले वाड्यात पोचणार आहे. महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 30 एप्रिलला राज्यभर शेतकरी, शेतमजूर कायदेभंग करून स्वत:ला अटक करवून घेणार आहेत.
सरकारने दिलेली आश्वासने
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, शेतीमालाला उत्पादन खर्चावर 50 टक्के अधिक हमीभाव, दूधउत्पादक शेतकऱ्यांना न्याय देणे, शेतकरी आंदोलनाच्या काळातील गुन्हे मागे घेणे यासह अन्य मागण्या मंजूर करूनही शासनाने आश्वासने पाळलेली नाहीत.
|