औरंगाबाद - परतीच्या पावसाने भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे फळ आणि पालेभाजींचा प्रचंड तुटवडा असल्याने शहरात आवक घटली आहे. परिणामी, भाज्यांचे दर वाढले आहेत. एरवी तीस ते चाळीस रुपये किलो दराने मिळणारे कांदे व वांग्यांची सध्या साठ रुपये दराने विक्री होत आहे. भाजीपाल्यामध्ये ठोक भावापेक्षा किरकोळ बाजारपेठत ही वाढ झाली आहे.
बाजार समितीतील भाजी मार्केटबरोबर औरंगपुरा, पीरबाजार व चिकलठाणा येथील बाजारपेठेतही भाज्यांचे दर कडाडले आहेत. ऑक्टोबरच्या मध्यावर झालेल्या पावसामुळे परिसरातील भाजीवर्गीय पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे मालाचा तुटवडा जाणवला. यामुळेच ही भाववाढ झाली आहे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. ठोक विक्रीमध्ये सर्व भाज्यांचे भाव हे समपातळीवर आहेत; मात्र किरकोळ विक्रीमध्ये जवळपास दुपटीने भाववाढ झाली आहे. दिवाळी संपताच ग्राहकांना भाववाढीला समोरे जावे लागत असल्याने गृहिणींचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे.
फळे स्वस्त
पालेभाज्यांचे दर वाढले असले तरी फळाच्या किमतीत कोणतीही वाढ झालेली नाही. फळाची आवक वाढल्यामुळे शहरात फळे स्वस्त झाली आहेत. यात सफरचंदाची 50 ते 80 रुपये किलोने विक्री होत आहे. सीताफळ 30 ते 40 रुपये, पपई 20 ते 30 रुपये किलो दराने मिळत आहेत. याशिवाय चिकू, अननस, मोसंबी यांचे भावही पूर्वीपेक्षा कमी असल्याचे फळविक्रेत्यांनी सांगितले.
भाज्य----- दर (किलोमध्ये)
कांदा------ 60
वांगे------- 60
टोमॅटो----- 50
गाजर -------100
दुधी भोपळा----60
पत्ताकोबी ---- 60
फ्लॉवर------ 80
मेथी जुडी----10
कोथिंबीर-------10
कारला --------25
शेवगा ------- 200
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.