‘फिजिकल डिस्टन्स’चाही बोजवारा ! ग्राहक तर विसरलेच, व्यापारीही झाले निर्धास्त

aurangabad 16.jpg
aurangabad 16.jpg

औरंगाबाद : कोरोनाच्या अनुषंगाने प्रशासनाचेच गांभीर्यच संपल्याने बाजारपेठेत आणि चौकाचौकांत फिजिकल डिस्टन्सचा फज्जा उडत आहे. नागरिक बिनधास्त विनामास्क फिरत आहेत. दुकानदारांकडेही ऑक्सिमीटर तर नाहीच मात्र सॅनिटायझर दिसेनासे झाले आहे. दुकानात गर्दी होत असताना कुणीही दुकानदार नागरिकांना रोखत नाही. ही भयानक परिस्थिती कोरोनाचे आकडे कायम असताना दिसत आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे १० ते १८ जुलैदरम्यान कडक लॉकडाउन करण्यात आला. या काळात लॉकडाउनची कडक अंमलबजावणी केल्याने गोरगरिबांचे प्रचंड हाल झाले. मात्र कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी उगारलेला हा बडगा नागरिकांनी निमूटपणे सहन केला. लॉकडाउननंतर दुकानदारांवर बंधने घालण्यात आले. सॅनिटायझर, ऑक्सिमीटरची सक्ती करण्यात आली. दुकानात गर्दी होणार नाही याची काळजी व्यापाऱ्यांनी घ्यावी यासाठी मनपा आयुक्तांनी कठोर भूमिका घेतली, त्यामुळे व्यापाऱ्यांनाही आपल्या जबाबदारीची जाणीव झाली; पण प्रशासन केवळ लॉकडाउनची सक्ती करण्यापुरतेच होते हेही व्यापाऱ्यांच्या लक्षात आले. त्यामुळेच आता व्यापारीही बेफिकीर झाल्याचे चित्र आहे.

फिजिकल डिस्टन्सचा फज्जा
शहराच्या विविध चौकांमध्ये भाजी विकणारे फिजिकल डिस्टन्स न पाळता उभे राहत आहेत. त्यात नागरिकही बेफिकीरपणे वागत आहेत. विशेष म्हणजे या भाजीविक्रेत्यांना किंवा नागरिकांना जाणीव करून देण्याची जबाबदारी प्रशासनाला वाटत नाही. त्यामुळे महापालिका कर्मचारी आणि पोलिसांच्या साक्षीने फिजिकल डिस्टन्सचा चौकाचौकांत हातगाड्यांवर गर्दीच्या रूपाने फज्जा उडालेला दिसत आहे.

शासनाच्या निर्देशाकडे दुर्लक्ष
कोरोनाबरोबर आपल्याला जगावे लागणार आहे. म्हणूनच कोरोनाला दूर ठेवण्यासाठीच्या विविध उपायांमध्ये फिजिकल डिस्टन्स हा सर्वांत महत्त्वाचा उपाय आहे. यासाठी शासकीय पातळीवर जनजागृती करण्यासाठी कोट्यवधी रुपये जाहिरातींवर खर्च करण्यात येत आहेत; मात्र प्रशासकीय पातळीवर अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांना मात्र फारसे गांभीर्य नाही. महापालिका अथवा पोलिस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे.

चौकाचौकांत गोंधळ
शहरातील बजरंग चौक, मुकुंदवाडी, टीव्ही सेंटर, गजानन मंदिर; तसेच सिडकोतील विविध भागांमध्ये भाजीपाला आणि विविध फळांच्या हातगाड्या भररस्त्यावर फिजिकल डिस्टन्स न पाळता उभ्या राहत आहेत. भाजीविक्रेते अगदी खेटून उभे राहत असल्याने आणि एकापेक्षा अधिक ग्राहक जमा होत असल्याने कोरोना संसर्गाची भीती अधिक आहे. या विक्रेत्यांना नियमांची आठवण करून देण्यासाठी मनपाचा कुठलाही कर्मचारी फिरताना दिसत नाही.

पथकांची नजर आवश्यक
शहरात भाजी खरेदीच्या वेळी किंवा दुकानावर, पेट्रोलपंपावर अथवा कुठेही म्हणजे जिथे जिथे गर्दी होते अशा ठिकाणी मनपाचे कर्मचारी आणि पोलिसांनी थेट कारवाया सुरू केल्या तरच लोकांमध्ये फिजिकल डिस्टन्स पाळण्यासाठी कारवाईची भीती निर्माण होऊन शिस्त लागू शकते.

Edit-Pratap Awachar
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com