जिल्हा बँक निवडणूक: आता चेअरमन निवडीसाठी ‘फिल्डिंग’... नितीन पाटील राहणार की अन्य कोणी येणार?

aurangabad district bank
aurangabad district bank

औरंगाबाद: जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत धक्कादायक निकाल लागले. शेतकरी विकास पॅनेलचे १४ संचालक निवडून आले. यामुळे बँकेचा चेअरमन याच पॅनलचा होणार हे निश्‍चितच. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ज्येष्ठ संचालक आमदार हरिभाऊ बागडे यांनी विद्यमान अध्यक्ष नितीन पाटीलच आमचे चेअरमन (बँकेचे अध्यक्ष) राहतील, अशी घोषणा केली होती. काल लागलेल्या निकालानंतर राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनीही नितीन पाटील अध्यक्ष असतील अशी घोषणा केली. असे असले तरी राज्यात भाजप विरुद्ध शिवसेना असा वाद सुरु असून त्याचा चेअरमन निवडीवर परिणाम होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

निवडणुकीनंतर आता बँकेच्या चेअरमनपदासाठीची फिल्डींग सुरु झाली आहे. यात बागडे यांचा पराभव झाल्याने बँकेत राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि त्यानंतर नितीन पाटील यांचेच वर्चस्व आहे. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे अर्जुन गाढे, सुरेखा काळे, स्वत: सत्तार आणि कृष्णा पाटील डोणगावकर, देवयानी डोणगावकर हे सत्तार यांच्या बाजूने येण्याची शक्यता आहे.

यामुळे सत्तार हे बँकेवर पकड मजबूत करण्याची प्रयत्न करीत आहेत. असे असले तरी, विद्यमान अध्यक्ष नितीन पाटील हेही चार ते पाच संचालकाच्या माध्यमातून बँकेवर पकड ठेवून आहेत. सुरेश पाटील यांच्यानंतर नितीन पाटील हे गेल्या एक ते दीड वर्षांपासून बँकेचा कारभार सांभाळत आहेत. यावेळी पुन्हा त्यांच्याच नावाची घोषणा झाली आहे. सध्यातरी नितीन पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र राजकारणात काहीही होऊ शकते. वरिष्ठ पातळीवर शिवसेनेतर्फे चेअरमनपद ताब्यात मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यात आमदार अंबादास दानवे यांचे नाव चर्चेत आहे. इतर संचालक मंडळ काय निर्णय घेते याकडेच सर्वांचे लक्ष लागून आहे. 

निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराला आला एक कोटी रुपयांपर्यंत खर्च! 
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मतदान हे वैयक्तिक स्वरूपाचे झाले. निवडणुकीत ज्यांनी मतदारांची मर्जी राखली तेच विजयी झाले, अशी चर्चा आहे. यंदाची ही निवडणूक उमेदवारांसाठी मोठी खर्चीक ठरली असली, तरी मतदारांची चांदी करणारी ठरली. या निवडणुकीत प्रतिमत ५० हजार रुपये पर्यंत गेले असून काही उमेदवारांना एक ते दीड कोटी पर्यंत खर्च असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

खैरेंचा चमत्कार होणार का? 
जिल्हा बँक निवडणुकीत चमत्कार होईल, असा दावा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला होता. त्यानुसार बँकेचा निकालही धक्कादायक लागला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. यामुळे बँकही महाविकास आघाडीच्या ताब्यात यावी यासाठी चंद्रकांत खैरै आग्रही आहेत. चेअरमन निवडीसाठी चमत्कार होणार का याकडेही लक्ष लागून आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com