एमपीएससी देताना परीक्षार्थींसमोर अडथळ्यांचा डोंगर; लॉकडाऊनमुळे अनेक अडचणी

MPSC Exam News
MPSC Exam News

औरंगाबाद : राज्यासह मराठवाड्यात कोरोनाची रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा स्थितीत आता २१ मार्च रोजी राज्यसेवेची पुर्व परिक्षा आयोजित करण्यात आली आहे. औरंगाबादेत रविवारी लॉकडाऊन असल्याने विद्यार्थ्यांसमोर वाहतूक, जेवणासह अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. एमपीएससीची नियोजित परीक्षा १४ मार्चला होणार होती. पण आयोगाने ११ मार्चला पत्रक काढून, कोरोनाच्या वाढत्या प्रभावाचे कारण देत परीक्षा काही काळासाठी पुढे ढकलली होती. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात विद्यार्थी रस्त्यावर आले होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी परीक्षा लवकरच घेण्याचे आश्वासन दिले होते. सुधारीत तारखेनुसार आता ही परीक्षा रविवारी २१ मार्च रोजी होणार आहे.

 
राज्यातील काही जिल्ह्यांतील परिस्थिती पाहता तिथं परीक्षा आयोजित करणे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. कारण काही जिल्ह्यात २१ मार्चपर्यंत लॉकडाऊन आहे तर बऱ्याच जिल्ह्यात आठवड्याच्या शेवटी २० आणि २१ तारखेला पूर्ण लॉकडाऊन आहे. परीक्षा ही २१ तारखेला असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अडचणीतही वाढ झाली आहे. अशात विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहचण्यासाठी जिल्हाअंतर्गत किंवा आंतरजिल्हा प्रवास करावा लागणार आहे.

काही जिल्ह्यात शनिवार आणि रविवारी पूर्णपणे लॉकडाऊन असल्याने पोलिस प्रशासनावरही मोठा ताण येणार आहे. सध्या राज्यातील आठ जिल्हे देशातील कोरोना हॉटस्पॉट ठरले आहेत. यामध्ये पुणे, नागपूर, अमरावती, मुंबई, ठाणे, औरंगाबाद, नांदेड, जळगाव, नाशिक या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रसार वाढत आहे. मागील २४ तासांतील कोरोना आकडेवारी पाहिली तर चिंता वाढवणारी आहे. या परीक्षेसाठी २१ मार्चला लाखों विद्यार्थी परीक्षेसाठी बाहेर पडतील. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाला काळजी घ्यावी लागणार आहे.
 


"परीक्षेदिवशी शहरातील वाहतूक व्यवस्था सुरु असेल. सध्या शहरातील कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतःची काळजी घेतली पाहिजे. मास्क, सॅनिटायजर सोबत ठेवावे. तसेच शहरात हॉटेलमध्ये पार्सलच्या सुविधा सुरु आहेत. परीक्षा व्यवस्थितरित्या होतील."
- सुनिल चव्हाण, जिल्हाधिकारी, औरंगाबाद

 

विद्यार्थ्यांच्या अडचणी कमी व्हायला मार्ग नाही. वेगवेगळ्या ठिकाणी लॉकडाऊन झाल्यामुळे परीक्षा केंद्रावर जायला अडचण येणार आहे. मराठवाड्यातल्या ज्या मुलांनी परीक्षा केंद्र औरंगाबाद दिले आहे त्यांना इतर ठिकाणाहून इतक्या सकाळी येण्याची सोय नाही. आदल्या दिवशी रात्रीच मुकामाला येऊन थांबायचं म्हणलं तर हॉटेल लॉज बंद. प्रायव्हेट गाडी करून जायच म्हणलं तर सामान्य कुटुंबातील मुलांना शक्य नाही.
-विठ्ठल गुजले, विद्यार्थी
 

मागील दोन वर्षांपासून परीक्षा होत असल्याने माझ्यासारख्या लाखो विद्यार्थ्यांसाना एक नवा आशेचा किरण दिसत आहे. पण या परिक्षादेखील रद्द होऊ नयेत एवढीच इच्छा आहे.
-अमोल घुगे, विद्यार्थी
 

काहीही करुन या परीक्षा झाल्या पाहिजेत. शासनाने त्यांच्यापरीने सगळ्या सुविधा द्याव्यात. ही परीक्षा पुन्हा रद्द झाली तर माझ्यासह अनेक विद्यार्थ्यांचं खूप मोठं नुकसान होईल.
-तुकाराम नाटकर, विद्यार्थी

 

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com