औरंगाबाद : शहरात पाणीप्रश्नाची तीव्रता कमी करण्यासाठी महापालिकेने पाणी चोरांच्या विरोधात मोर्चा वळविला आहे. अनधिकृत नळांचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र पथक तैनात करण्यात आले असून, हे पथक विविध वसाहतींमध्ये जाऊन पाहणी करत आहे. पहाडसिंगपुरा भागात ४०० मिलिमिटर व्यासाच्या पाइपलाइनवरून सुमारे १२०० बेकायदा नळ पाहून अधिकारी आचंबित झाले. मात्र, पोलिस बंदोबस्त मिळाला नसल्याने या बेकायदा नळांवर अद्याप कारवाई झालेली नाही.
उन्हाळा सुरू झाल्यापासून शहरातील पाणी प्रश्न गंभीर झाला आहे. सिडको-हडकोसह काही भागांना आठव्या-नऊच्या दिवशी नळाला पाणी येत होते. त्यामुळे ओरड सुरू होताच प्रशासनाने उपाय-योजना सुरू केल्या आहेत. त्यानुसार आता संपूर्ण शहरात पाच दिवसाआड म्हणजेच सहाव्या दिवशी पाणी येत आहे. शहरात येणाऱ्या पाण्यात आठ एमएलडीने वाढ झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. आणखी उपाय-योजना सुरू असून, आठवडाभरात आणखी पाणी वाढणार आहे. त्यामुळे पाणीप्रश्न आटोक्यात येईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.
एकीकडे शहरात येणाऱ्या पाण्यामध्ये वाढ करत असताना दुसरीकडे पाणीचोरी रोखण्यासाठी देखील प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी मुख्य लेखाधिकारी संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली पथक तैनात करण्यात आले. पथकाने पहाडसिंगपुरा, लक्ष्मीकॉलनी, शांतीपुरा भागात पाहणी केली असता बेकायदा शेकडो नळ कनेक्शन असल्याने नागरिकांना पाणीच मिळत नसल्याचे समोर आले.
पोलिस बंदोबस्तानंतर कारवाई
बेकायदा नळ तोडताना मोठा तणाव निर्माण होतो. त्यामुळे महापालिकेने बेकायदा नळ तोडण्यासाठी पोलिसांकडे बंदोबस्ताची मागणी केली आहे. पहाडसिंगपुरा, लक्ष्मीकॉलनी, शांतीपुरा आदी वसाहती बेगमपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येतो. त्यानुसार अर्ज देण्यात आला आहे. पोलिसांकडून बंदोबस्त मिळताच कारवाई केली जाणार आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.