औरंगाबाद : जास्तीचे पाणी सोडण्यासाठी अनेक जण वॉलमॅनला हाताशी धरत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे आता कोणत्या भागात किती वेळ पाणी सोडले. वॉल्व्ह किती वेळ उघडला, किती वेळात बंद केला याची माहिती ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. दोन हजार ९०० वॉल्व्हचे लोकेशन मॅप करण्यात आले असून, जिओ फेन्सिंगच्या माध्यमातून वॉलमनला पंच बंधनकारक केले जाणार असल्याचे महापालिकेचे प्रभारी प्रशासक तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी शुक्रवारी सांगितले.
शहरातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी सुरू असलेल्या उपाय-योजनांची माहिती देताना श्री. चव्हाण म्हणाले की, ३१ टाक्यांवरून सध्या पाणी पुरवठा सुरू आहे. त्यासाठी तीन हजार ५०० वॉल्व्ह आहेत. यातील जोन हजार ९०० वॉल्व्हचे लोकेशन मॅप करण्यात आले आहेत. पाणी सोडणाऱ्या २९० वॉलमॅनला ॲन्ड्रॉईड मोबाईल देण्यात येणार असून, त्याचे जिओ फेन्सिंग करण्यात येणार आहे.
त्यामुळे एखाद्या वसाहतीला पाणी देण्यासाठी किती वाजता वॉल्व्ह उघडला याचे पंचींग कर्मचाऱ्याला करावे लागणार आहे. असेच पंच वॉल्व्ह बंद करताना करावे लागणार आहे. कोणत्या भागाला नियमापेक्षा जास्त पाणी गेले असेल तर लगेच माहिती मिळणार आहे. अनेक वसाहतींमध्ये वॉलमनला हाताशी धरुन, वेळप्रसंगी दबाव टाकून जास्तीचे पाणी घेतले जाते. या यंत्रणेमुळे अशा प्रकारांना आळा बसणार आहे, असे श्री. चव्हाण यांनी सांगितले.
कमांड सेंटरमध्ये असेल सर्व माहिती
स्मार्ट सिटी कार्यालयात कमांड सेंटर आहे. तिथून वॉलमॅनवर वॉच ठेवला जाईल. यापूर्वी पाणी सोडण्याचे नियोजन हे डायरीमध्ये नमूद केले जात होते. पण आता ऑनलाईन पद्धतीने ॲन्ड्रॉईड मोबाईलच्या माध्यमातून वॉलमॅनला नोंदी कराव्या लागणार आहेत, असे श्री. चव्हाण यांनी सांगितले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.