औरंगाबाद : ‘रिकामा हंडा, पाण्याविना सखे कोरडा’सारखे विविध बॅनर, भगवा आणि कमळाचा गमछा गळ्यात घालून हजारो नागरिकांनी जल आक्रोश मोर्चात सहभाग नोंदविला. ‘पाणी द्या...पाणी द्या’... किंबहुना, किंबहुना काय म्हणता... अशा विविध घोषणा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पैठण गेट ते महापालिकेदरम्यान मोर्चात देण्यात आल्या.
आठवडाभरापासून भाजपने मोर्चाची जोरदार तयारी केली होती. त्यानुसार मोर्चात प्रत्येक वार्डातील महिला सायंकाळी चार वाजेपासून रिकामे हंडे सहभागी झाल्या होत्या. सायंकाळी साडेपाचदरम्यान मोर्चास पैठण गेट येथून सुरवात झाली. उघड्या जीपमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड, आमदार हरिभाऊ बागडे, आमदार अतुल सावे, नारायण कुचे, संजय केणेकर, विजया राहटकर सहभागी होते. टाळ मृदंगाच्या गजरात एक मंडळ, जागरण गोंधळ करणारा ग्रूप सर्वांचे आकर्षण ठरले.
पैठण गेट येथे सुहास दाशरथी यांनी तर डाव्या बाजूने भाजपतर्फे स्टेज उभारण्यात आले होते. शहरात ठिकठिकाणी बॅनरबाजी तर काही ठिकाणी कटआऊट लावण्यात आले होते. मोर्चात राजू शिंदे, प्रमोद राठोड, शिवाजी दांडगे, महेश माळवतकर, नितीन चित्ते, समीर राजूरकर, माधुरी अदवंत, अमृता पालोदकर,अनुराधा चव्हाण, सविता कुलकर्णी, प्रशांत देसरडा, दिलीप
थोरात, संजय जोशी, जगदिश सिध्द, जालिंदर शेंडगे, राजेंद्र साबळे पाटील, सिध्दार्थ साळवे, सागर पाले, अरुण पालवे, लक्ष्मीकांत थेटे, कचरु घोडके, अनिल मकरिये, प्रवीण घुगे, बसवराज मंगरुळे, मयूर वंजारी यांनी सहभाग घेतला. मोर्चात २५ ते ३० हजार नागरिकांनी सहभाग घेतल्याचा दावा केंद्रीयय राज्यमंत्री डॉ. कराड यांनी केला.
शिवसेनेचे बॅनर फाडले
पैठण गेटवरून निघालेल्या मोर्चातील काही जणांनी शिवसेनेने लावलेले गॅस दराबाबतचे जिल्हा परिषदेजवळील बॅनर फाडले. यात सेनेतर्फे भाजपचे बॅनर फाडल्याचा आरोप करीत हे बॅनर फाडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी शिवसेनेचे अनेक ठिकाणचे बॅनर मोर्चापूर्वी काढून घेतले होते. मात्र, जिल्हा परिषद जवळील बॅनर फाडण्यात आले.
या दिल्या घोषणा
खैरे झाले बहिरे...सोनियाचा पोपट काय म्हणतो, कोण आला रे कोण आला... शिवसेनेचा बाप आला... पाणी आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, अगर हमे ना मिला पाणी तो, आप को याद, दिलायेंगे नानी, आता नाही चालणार आघाडीची मनमानी, घेऊन राहणार हक्काचे पाणी...अशी घोषणाबाजी झाली.
क्षणचित्रे
महिलांचे विविध स्लोगन असलेले बॅनर आणि हंडे घेऊन सहभाग
दौलताबादेतून दोन उंटांचा सहभाग
मोर्चात सहभागी झालेल्यांसाठी ठिकठिकाणी पाण्याची व्यवस्था
चिकलठाणा येथील तरुणांनी कावड यात्रा काढत निषेध केला.
मोर्चात मुस्लिम महिलांचाही सहभाग
शहरासह, ग्रामीण भाजप पदाधिकाऱ्यांचा सहभाग
पाण्यामुळे महिलांना होणारा त्रास देखाव्यांच्या माध्यमातून दाखविण्यात आला.
८० वर्षीय आजीचा मोर्चात हंडा घेऊन सहभाग
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.