औरंगाबाद : हर्सूल तलावातून पाच एमएलडी पाणी वाढवण्यासाठी नवी पाइपलाइन टाकण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. जटवाडा येथील जल शुद्धीकरण केंद्रापर्यंतचे या पाइपलाइनचे काम सत्तर मीटर एवढे काम बाकी आहे.
दोन दिवसात काम संपणार असून, त्यानंतर कनेक्शन जोडण्यासाठी मंगळवारी किंवा बुधवारी एक दिवसाचा शटडाऊन घेतला जाणार आहे. त्यामुळे जुन्या शहरातील १४ वॉर्डांचा पाणी पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. उन्हाळा सुरू झाल्यापासून शहरातील पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. त्यात हर्सूल तलावाने महापालिकेला मोठी साथ दिली.
हर्सूल तलावातून जुन्या शहरातील १४ वॉर्डांना पाणी पुरवठा केला जातो. नैसर्गिक प्रवाहातून महापालिकेला साडेचार एमएलडी पाणी दररोज मिळते. मात्र यंदा तलावात मुबलक पाणी आहे. त्यामुळे पाणी उपशात वाढ करण्यासाठी तलावापासून जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत नवीन पाइपलाइन टाकण्याचे काम हाती घेतले आहे. हे अंतर सुमारे सातशे मीटर असून, ३५० मिलिमीटर व्यासाची पाइपलाइन टाकली जात आहे.
यासंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता अजयसिंह यांनी सांगितले की, पाइपलाइनचे फक्त सत्तर मीटरचे काम बाकी आहे. काम पूर्ण झाल्यावर तलावाजवळच क्रॉस कनेक्शन द्यावे लागणार आहे. त्यासाठी संपूर्ण एक दिवस शटडाऊन घ्यावा लागेल. मंगळवार किंवा बुधवारी शटडाऊन घेण्याचे नियोजन केले जाऊ शकते. क्रॉसकनेक्शनचे काम झाल्यास नवीन पाइपमधून पाणी पुरवठा सुरु होईल. या पाइपलाइनमुळे सुरुवातीला पाच एमएलडी पाणी वाढवण्याचे नियोजन आहे, पाणी वाढल्यावर सिडको-हडकोवरील ताण कमी होईल, असे अजयसिंह यांनी सांगितले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.