
Chhatrapati Sambhaji Nagar : कसे असावे आपल्या मनातील स्मार्ट शहर?
छत्रपती संभाजीनगर : शहर चोहोबाजूने विस्तारतेय. ही एका अर्थाने चांगली बाब असली तरी या विस्तारलेल्या भागात रस्ते, पाणी, ड्रेनेज, कचरा, पथदिवे, उद्यान, मोकळ्या जागा, अतिक्रमण, पार्किंग, टँकर अशा अनेक समस्या जीवघेण्या ठरताहेत. नागरिकांच्या याच समस्या हक्काच्या व्यासपीठावर मांडण्यासाठी ‘सकाळ’ सोमवार (ता.२४) पासून नागरिकांसोबत ‘सकाळ संवाद’ हा उपक्रम सुरू करत आहे. या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या समस्या बिनधास्त मांडता येतील.
छत्रपती संभाजीनगरमध्ये स्मार्ट सिटीची कामे होत असताना शहराच्या आजूबाजूचा परिसर वेगाने विकसित होत आहे. मात्र, येथे रस्त्यापासून तर पिण्याच्या पाणी समस्या गंभीर आहे. ऐतिहासिक शहर म्हणून छत्रपती संभाजीनगरची ओळख आहे. परंतु, शहरात पायाभूत सुविधांच्या संदर्भातील अनेक प्रश्न आहेत.
दिवसेंदिवस शहराची लोकसंख्या वाढतेय. त्या तुलनेत पायाभूत सुविधांचा मात्र अभाव दिसतोय. पाणी, कचरा, आरोग्य, महिलांची सुरक्षा, स्वच्छतागृह अशा मूलभूत गरजा पूर्ण होणे आवश्यक आहे. तसेच देश-विदेशातून पर्यटक येतात. परंतु, अस्वच्छता, रस्ते खराब असल्याने शहराची प्रतिमा खराब झाल्याची दिसते.
डब्ल्यू-२० निमित्त शहरातील बाह्य रस्त्यांवर स्वच्छता सौंदर्यीकरण करण्यात आले. मात्र, जुन्या शहरात आणि परिसरात मात्र जीवघेण्या समस्या आहे. शहराच्या परिसरात चांगल्या दर्जाचे रस्ते व्हावीत, कचरा प्रश्नाची सोडवणूक झाली पाहिजे, शहरातील तरुणांसाठी शहरातच रोजगाराची संधी उपलब्ध व्हायला हव्या.
मागील काही वर्षांत शहरात तरुणांमध्ये व्यसनाधीनता वाढली आहे. त्यातून गुन्हेगारीचा आलेख वाढतोय. त्यावर अंकुश आणणे गरजेचे आहे. या आणि अशा विविध समस्यांना या मंचामार्फत वाचा फोडता येईल. आपल्याला आपल्या वसाहतीत, भागात काय सुविधा हव्या हेही आपण ‘सकाळ’च्या मंचावर बिनधास्तपणे मांडू शकता.
असा राहील ‘सकाळ संवाद’
पहिली बैठक : सोमवार, ता. २४ एप्रिल
वेळ : सायंकाळी पाच वाजता
स्थळ : हनुमान मंदिर, नाईकनगर, बीड बायपास, छत्रपती संभाजीनगर
दुसरी बैठक : मंगळवार, ता.२५ एप्रिल
वेळ : सायंकाळी पाच वाजता
स्थळ: सिल्व्हर इस्टेट, दीपनगर, छत्रपती संभाजीनगर