सुटीवरून परतला अन् झाली कोरोनाबाधा 

Corona News Aurangabad
Corona News Aurangabad

औरंगाबाद : सातारा येथील राज्य राखीव पोलिस बटालियनमधील जवानाला कोरोनाची लागण झाली आहे. सुटीवर असलेला हा जवान नगर जिल्ह्यातील आपल्या गावाहून जाऊन परतला होता. आता महापालिकेतर्फे जवानाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. 

सातारा येथील भारतीय बटालियनमधील जवान बुधवारी (ता.२९) कोरोना पॉझिटिव्ह निघाला. हा जवान काही दिवसांपूर्वी सुटीवर गेला होता. तो नगर जिल्ह्यातील गावी होता. १७ एप्रिलला परतला होता. हा जवान कोरोनाबाधित आढळल्याने भारतीय बटालियनमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या जवानाचा किती जणांशी संपर्क आला, तो कोणाला भेटला, याची माहिती भारतीय बटालियनमधील डॉक्टर घेत आहेत, असे वैद्यकीय अधिकारी डॉ. उनवणे यांनी सांगितले. दरम्यान, बटालियनमधील जवानांचे क्वॉटर्स, कार्यालय व संपूर्ण परिसरात जंतुनाशक फवारणी करण्यात आली. रस्ते व इमारती स्वच्छ करण्यात आल्या. अग्निशमन बंबाच्या साह्याने फवारणी केली. सातारा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, वॉर्ड अधिकारी दौड, वैद्यकीय अधिकारी डॉ. बाबासाहेब उनवणे, पर्यवेक्षक शेख अन्वर शेख दादाभाई, अग्निशमन अधिकारी आर. के. सुरे, गायकवाड उपस्थित होते. 

गरुदत्तनगरचे कनेक्शन मिळेना 
गारखेडा परिसरातील गुरुदत्तनगरातील वाहनचालक कोरोनाबाधित निघाला आहे. त्यानंतर महापालिकेने तातडीने गुरुदत्तनगरचा भाग सील करून त्याची पत्नी व मुलाला ताब्यात घेऊन क्वारंटाइन करण्यात केले आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. मेघा जोगदंड यांनी बुधवारी (ता. २९) दिली. या परिसरात जंतुनाशकाची फवारणी करण्यात आली; तसेच शेजारच्या नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी गुरुवारी (ता. ३०) आरोग्य पथक या भागात जाणार असल्याचे डॉ. जोगदंड यांनी सांगितले. मात्र या चालकाला कोरोनाची लागण कुठून झाली याचा शोध महापालिका प्रशासन घेत आहे.

 
तब्बल ५४३ जणांना केले क्वारंटाइन 
५४३ जण क्वारंटाइन 
महापालिकेने गेल्या २४ तासांत कोरोनाच्या रेड झोन भागातून तब्बल ५४३ नागरिकांना कुटुंबासह क्वारंटाइन केले आहे. आजपर्यंत क्वारंटाइन करण्यात आलेल्यांची संख्या ९१० एवढी झाली आहे. बुधवारी क्वारंटाइन करण्यात आलेल्यांमध्ये हायरिस्क भागातील २८०, तर स्क्रीनिंग सेंटर्समधील १० जणांचा समावेश आहे. 

‘सारी’ला पुन्हा ब्रेक 
कोरोनापेक्षा सारीच्या बळींची संख्या जास्त आहे; मात्र सारीच्या रुग्णसंख्येला आता ब्रेक लागला आहे. सोमवारी (ता.२७) सारीचा एकही रुग्ण आढळला नव्हता. मंगळवारी (ता. २८) केवळ दोन रुग्ण आढळले. बुधवारी (ता. २९) पुन्हा एकही रुग्ण आढळला नाही. आतापर्यंत ‘सारी’च्या २७७ रुग्णांची नोंद आहे. त्यातील तब्बल १६ जणांचे बळी गेले आहेत; मात्र गेल्या काही दिवसांत मृत्यूचे प्रमाणही घटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com