औरंगाबाद: कोरोना संसर्गाचा सर्वाधिक धोका वृद्धांना असल्याचे पहिल्या व दुसऱ्या लाटेदरम्यान सांगितले जात होते. आता संभाव्य तिसऱ्या लाटेत बालकांना धोका असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पण आजपर्यंतची बाधितांची आकडेवारी पाहता तरुणांनाच सर्वाधिक संसर्ग झाला आहे. त्यांची टक्केवारी ६०.८७ एवढी नोंदली गेली आहे. कामा निमित्ताने घराबाहेर पडणारे तरुणच शहरात कोरोना संसर्गाचे सुपर स्प्रेडर ठरत आहेत.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत मार्च २०२० पासून शहरातील तरुणच मोठ्या संख्येने बाधित आढळून आले. दुसऱ्या लाटेतही हेच चित्र कायम आहे. नोकरी, विविध कामे, खरेदीसाठी घराबाहेर पडणाऱ्या तरुणांना कोरोनाची बाधा होत आहे. महापालिकेने गुरुवारी (ता. २०) दिलेल्या अहवालानुसार शहरात आत्तापर्यंत ८४ हजार ९२१ कोरोना रुग्ण आढळून आले. त्यातील ५१ हजार ६९८ रूग्ण हे १८ ते ५० वर्षे वयायेगटातील आहेत.
हे प्रमाण ६०.८७ टक्के एवढे आहे. तिसरी लाट बालकांसाठी धोक्याची असल्याचे मानले जात असले तरी पहिल्या दोन लाटेत बालकांना संसर्ग कमी प्रमाणात झाला. पाच ते १८ वर्षे वयोगटातील बाधित बालकांचे प्रमाण ९.०५ टक्के आणि शून्य ते पाच वयोगटातील बाधित बालकांचे प्रमाण १.६१ टक्के एवढे आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने तरुणच घरातघरात कोरोना नेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ज्येष्ठांचा मृत्युदर वाढला
कोरोनाबाधितांमध्ये तरुणांचे प्रमाण जास्त आहे. तसेच कोरोनावर मात करणारांमध्येही तरुणाचे प्रमाण जास्तच आहे. वृद्धांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. पहिल्या लाटेत ज्येष्ठांच्या मृत्यूचे प्रमाण २५ टक्क्यापर्यंत नोंदले गेले. दुसऱ्या लाटेत हे प्रमाण काही काळ ३२ टक्क्यापर्यंत पोचले होते. आत्तापर्यंत ५० वर्षांवरील २४,१६१ नागरिक कोरोनाबाधित झाले. हे प्रमाण एकूण रुग्णाच्या २८.४५ टक्के एवढे आहे.
बाधितांची अशी आहे स्थिती -
शून्य ते ५ वर्षे - १,३६९ (०१.३१ टक्के)
५ ते १८ वर्षे - ७,६९३ (०९.०५ टक्के)
१८ ते ५० वर्षे - ५१,६९८ (६०.८७ टक्के)
५० वर्षांवरील - २४,१६१ (२८.४५ टक्के)
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.