
अपहरण करुन मागितली १० लाखांची खंडणी
औरंगाबाद : आर्थिक व्यवहारातून ३५ वर्षीय तरुणाचे अपहरण करुन त्याच्या वडीलांना १० लाख रुपये खंडणी मागणाऱ्या दोघा आरोपीच्या उस्मानपुरा पोलिसांनी आठ तासातच मुसक्या आवळल्या. तसेच पीडित मुलाची सुखरुप सुटका केली. शामराव सीताराम पवार (५४ रा. अंबड चौफुली जालना), शेख फय्याजोद्दीन सेख मेहराजोद्दीन (२३ रा. शंकरजीन जालना) अशी आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी मधुकर लहानू अवचरमल (५६, रा. रमानगर, उस्मानपूरा) यांनी २१ मार्च रोजी पहाटे पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार २० मार्च रोजी रात्री दहा वाजेदरम्यान त्यांना मोबाईलवर फोन आला. समोरुन पवार आणि फय्याज नावाच्या संशयितांनी ‘तुमच्या मुलाला आम्ही जालना येथे घेऊन आलो आहोत, तुमचा मुलगा तुम्हाला परत हवा असेल तर सकाळी जालन्यात १० लाख रुपये घेऊन या’ अशी खंडणीची धमकी देत फोन ठेवल्याच फिर्यादीत म्हटले होते. त्यावरुन गुन्हा दाखल होताच उस्मानपुरा ठाण्याच्या निरीक्षक गीता बागवडे यांनी सर्व यंत्रणा कामाला लावली. तांत्रिक तपासाद्वारे उपनिरीक्षक प्रविण वाघ यांच्यासह एक पथक जालन्याला पाठवत आठ तासाच्या आत फिर्यादी मधूकर यांचा मुलगा किशोर अवचरमल याची आरोपीच्या तावडीतून सुखरुप सुटका करत दोघा आरोपींना अटक केली.
आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पुढील तपास उपनिरीक्षक प्रवीण वाघ करत आहेत. ही कारवाई निरीक्षक गीता बागवडे, उपनिरीक्षक प्रविण वाघ, योगेश गुप्ता, सतीश जाधव, संदीप धर्मे यांनी केली.
यासंदर्भात पोलिसांनी सांगितले की, अपहरण झालेल्या किशोर या युवकाने नोकरी लावण्याचे अमिष दाखवून आरोपी शामराव पवार यांच्याकडून पैसे घेतले होते. शामराव यांच्या नातेवाईकास नोकरी लागली नाही आणि किशोर यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे आरोपींनी पैसे वसुल करण्यासाठी अपहरण करण्याची शक्कल लढविल्याची कबुली पोलीस चौकशीत दिली आहे.
Web Title: Crime Update Kidnapped And Demanded Rs 10 Lakh Ransom Police Action Accused Arrested In 8 Hours Aurangabad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..