औरंगाबाद : शिवसेनेतील बंडानंतर जिल्ह्यातील तब्बल पाच आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याने औरंगाबाद महापालिकेसह जिल्ह्यातील राजकारणाला कलाटणी मिळाली. आता महापालिकेची निवडणूक तोंडावर असताना एकनाथ शिंदे यांना शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्हही मिळाले आहे.
शिवसेना फुटीनंतर म्हणजेच सहा महिन्यात शिवसेनेचे फक्त तीन माजी नगरसेवक शिंदे गटात सहभागी झाले. त्यामुळे आता नाव व चिन्हानंतर शिंदे गटाची शहरात ताकद वाढणार, असा अंदाज बांधला जात आहे. महापालिकेत गेली २५ वर्षे शिवसेना-भाजप युतीची सत्ता होती.
पण राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग झाल्यानंतर या सत्तेतून भाजप बाहेर पडली. पण तोपर्यंत शिवसेनेचे महापौर असलेले नंदकुमार घोडेले यांचा कार्यकाळ संपत आला होता. महापालिकेची निवडणूक लागणार असा अंदाज बांधला जात असतानाच कोरोना संसर्ग सुरू झाला व लांबणीवर पडलेल्या निवडणूका पुढे विविध कारणांमुळे होऊ शकल्या नाहीत.
३४ महिन्यांपासून महापालिकेत प्रशासकीय कारभार सुरू असला तरी ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयातील याचिका निकाली निघताच महापालिका निवडणूका जाहीर होतील, असे सांगितले जात आहे. एकीकडे महापालिकेची निवडणूक तोंडावर असताना दुसरीकडे महापालिकेच्या प्रत्येक निवडणुकीत सर्वाधिक नगरसेवक देणारा शिवसेना पक्ष फुटीमुळे गलितगात्र झाला आहे.
शिवसेना फुटल्यानंतर सहा महिन्यापूर्वी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यांना जिल्ह्यातील सहा पैकी पाच आमदारांना साथ दिली. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारणाला कलाटणी मिळाली आहे. त्यासोबतच महापालिकेत काय होणार?
याविषयी चर्चा रंगत आहेत. शिंदे यांच्यासोबत आत्तापर्यंत फक्त तीन माजी नगरसेवक गेले आहेत. त्यात राजेंद्र जंजाळ यांना जिल्हाप्रमुखपद देण्यात आले. प्राजक्ता राजपूत यांचे पती विश्वनाथ राजपूत यांना शहरप्रमुख पद देण्यात आले.
शिल्पाराणी वाडकर यांना महिला आघाडीचे पद देण्यात आले. शुक्रवारी निवडणूक आयोगाने शिवसेना नाव व धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे यांना दिले. त्यामुळे आता तरी शिंदे यांना महापालिका निवडणुकीत ताकद मिळेल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शिवसेनेतून फुटून वेगळा शिंदे गट झाल्यानंतर जिल्ह्यातील पाच आमदार गेल्यानंतरच शिवसेनेच्या बालेकिल्ल्याचे बुरूज ढासळले. आता आयोगाने दिलेल्या या निर्णयामुळे शिवसेना ठाकरे गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.
सध्या तरी उरलेल्या पदाधिकारी आणि शिवसैनिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून त्यांना थोपवून खिंड लढवण्याचे जिल्ह्यातील शिवसेना (ठाकरे गट) नेत्यांपुढे आव्हान आहे. शिंदे गटाच्या बंडानंतर शिवसैनिकांना आता नाव आणि चिन्ह गमावल्याचा धक्का सहन करावा लागला.
यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या जिल्ह्यातील शिवसैनिकांची शुक्रवारच्या निर्णयाने अस्वस्थता वाढवली. हा निर्णय खूप जिव्हारी लागल्याचे काही पदाधिकाऱ्यांशी बोलल्यावर जाणवले. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेसाठी खूप महत्वाचे होते.
नाव आणि चिन्ह गेल्याने काही फरक पडणार नाही असे जरी ठाकरे गटातील नेत्यांना वाटत असले तरी यामुळे नुकसान तर होणार आहेच. मूळ शिवसेनेत राहिलेल्यांची आता भूमिका महत्वाची ठरणार आहे. कुंपणावर बसलेले काही वेगळा निर्णय घेऊ शकतात, निवडणुकांच्या तोंडावर गळती लागू शकते.
शिवसेना जिल्हाप्रमुख तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आंबादास दानवे यांनी ‘साहिल के सुकूं से किसे इंकार है, लेकीन तुफान से लडने मे मजा कुछ और ही है'' लढेंगे भी, जितेंगे भी असे ट्विट करत पुन्हा जिद्दीने उभे राहण्याचे आवाहन केले असले तरी येणाऱ्या काळात आता ठाकरे गटात राहिलेल्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी नेत्यांपुढे आव्हान राहणार आहे.
आयोगाचा निर्णय अनपेक्षित आहे, असा निर्णय व्हायला नको होता. चिन्ह जरी गेले असले तरी संघटना आणि सर्वसामान्य नागरीकांची सहानुभूती उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. आम्ही शिवसैनिक एकजुट आहोत आणि पक्षप्रमुखांसोबत आहोत. जे चिन्ह मिळेल ते घेवू आम्ही पुन्हा जिद्दीने निवडणुका जिंकू.
— किशनचंद तनवाणी, शिवसेना जिल्हाप्रमुख
शिवसैनिक डगमगणार नाहीत
अंबादास दानवे (विरोधी पक्षनेते विधान परिषद) : निवडणूक आयोग ज्या पक्षपातीपणाने वागत आहे त्यावरून आम्हाला या निर्णयाने काही धक्का बसलेला नाही, असे काही होईल हे गृहितच होते. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे नाव आमच्याकडे आहेच.
शिवसैनिक या निर्णयाने डगमगणार नाही. आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. शिवसैनिकांची सहानुभुती आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आमच्याकडे विचार आहेत. आमच्याकडे उद्धव ठाकरे ब्रॅण्ड आहेत. या बळावर आम्ही हा महाराष्ट्र पुन्हा काबीज केल्याशिवाय राहणार नाही.
आयोगाचा निर्णय लोकशाहीचा खून
चंद्रकांत खैरे (शिवसेना नेते) : आयोगाचा निर्णय सर्वांसाठी दुख:द आहे. हा लोकशाहीचा खून आहे. या निर्णयावरून आयोग कोणाच्यातरी दबावाखाली काम करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्यांनी शिवसेना फोडली, बाळासाहेबांची शिवसेना बळकावली ती खोक्यांमुळे.
हा फार मोठा आघात आहे. जनता ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावामागे आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाजूने जनता आहे. या निर्णयाने शिवसेनेला काही फरक पडणार नाही आम्ही पुन्हा नव्याने सुरूवात करू आणि शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच आहे हे दाखवून देवू. आयोगाने निर्णय दिला असला तरी जनता हा निर्णय स्विकारणार नाही.
निर्णयाचे स्वागत
डॉ. भागवत कराड (केंद्रीय अर्थराज्यमंत्री) ः निवडणूक आयोगाने लोकशाहीला धरून निकाल दिला आहे. सध्याच्या या परिस्थितीत सर्वात जास्त प्रतिनिधी हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. त्यामुळे आयोगाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.