औरंगाबाद : आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मराठा समाजाविषयी केलेल्या वक्तव्याप्रकरणी माफी मागावी, अशी मागणी करीत मराठा क्रांती मोर्चासह विविध संघटनांतर्फे मंत्री सावंत यांचा निषेध करण्यात आला. तसेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी तानाजी सावंत यांना समज द्यावी, अन्यथा गंभीर परिणाम होतील, असा थेट इशाराच मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सोमवारी दिला. मंत्री सावंतांनी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन हे वक्तव्य केले. मागील सरकारच्या काळात तानाजी सावंत यांना मंत्री व्हायचे होते. त्यावेळी हेच मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांसाठी शिष्टमंडळ म्हणून ऊन जात होते, हे आपण विसरलात का? सरकार कोणाचे आहे, कोणाचे नाही, याच्याशी आमचा संबंध नाही. राज्यात कुणाचेही सरकार आले, तरीही मराठा तरुणांची मागणी ही आरक्षणाची होती आणि आहे. आम्हाला टिकणारे आरक्षण पाहिजे. कॅबिनेटमंत्री असलेल्या सावंत यांच्या अशा वागण्यामुळे मराठा समाज बदनाम होतो, अशी टीकाही विनोद पाटील यांनी केली.
मराठा समाजाला ओबीसीत आरक्षणासाठी लढा सुरु आहे. ती घटनात्मक मागणी आहे आणि तो मराठा समाजाचा घटनादत्त अधिकार आहे. परंतु, तानाजी सावंतांसारख्या सरंजामी आणि प्रस्थापित मराठ्यांमुळे मराठा समाजाला आरक्षण मिळू शकले नाही. त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. यांनी तीस वर्षांत तीस पिढ्या बरबाद करण्याचे काम केले आहे. यांना गरीब मराठ्यांचे दुःख काय कळणार? मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने, संभाजी ब्रिगेडच्यावतीने तानाजी सावंत यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो.
-डॉ. शिवानंद भानुसे, प्रदेश प्रवक्ते, संभाजी ब्रिगेड
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.