साखरगाठ्यांची चव झाली कडू; कच्च्या मालाची दरवाढ, व्यावसायिकांना फटका

होळीचा सण अवघा काही दिवसावर येऊन ठेपला असल्याने बाजारात साखरेच्या गाठ्याला मागणी
Holi festival sugarcane tasted
Holi festival sugarcane tasted

कुंभार पिंपळगाव : होळीचा सण अवघा काही दिवसावर येऊन ठेपला असल्याने बाजारात साखरेच्या गाठ्याला मागणी आहे, दुसरीकडे कच्च्या मालात वाढ झाल्याने यावर्षी गाठ्यांच्या भावात वाढ झाली आहे.गोड गाठ्यांपुढे महागाई मात्र कडू असल्याने व्यावसायिक अडचणीत सापडत आहेत.

घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव परिसरात होळीच्या अगोदर दहा दिवसांपासून या उद्योगाला सुरुवात होते. होळीपासून गुढीपाडव्यापर्यंत गाठ्यांना मागणी असते. पूर्वी महाशिवरात्रीपासून पाडव्यापर्यंत महिनाभर हा उद्योग चालायचा,अगोदर मालाची बुकिंग केली जायची व नंतर माल दिला जायचा. मात्र दोन वर्षांपासून कोरोनाचा वाढता प्रसार, लॉकडाउन यामुळे उद्योग बंद होते.

गुढीपाडव्याला गुढीला गाठींचा हार घातल्या जातो तर होळीला खेड्यात लोक एकमेकांच्या घरी लहान मुलांना गाठी देतात.गुढीपाडव्यापर्यंत गाठ्यांना मागणी असते तर लग्न ठरलेल्या व या काळात लग्न झालेल्या नववधूला गाठी,चोळी देण्याची प्रथा आजही ग्रामीण भागात पाळली जाते.

पहिल्या लॉकडाउनमध्ये माल करता आला नाही, गेल्यावर्षी मार्चच्या सुरुवातीपासून आठवडी बाजार बंद झाले यामुळे बाजारात दुकाने लावता आल्या नाही, खेड्यातील व्यापाऱ्यांनीही माल नेला नाही, लॉकडाउनचा सतत दोन वर्ष फटका बसला यामुळे मोठे नुकसान झाले. यावर्षी कोरोनाचा उद्रेक कमी झाल्याने दहा दिवसांपासून गाठी उद्योगाला नव्या जोमाने सुरुवात झाली आहे. गाठ्याला मागणीही भरपूर आहे. गाठ्यांचा किरकोळ विक्रीचा भाव ९० ते शंभर रुपये किलो आहे तर ठोक ७० ते ८० रुपये किलो आहे.खेड्यातील अनेक किरकोळ व्यापारी ठोक माल नेतात.

यावर्षी साखरेच्या भावात क्विंटलमागे ३५० ते ४०० रुपये वाढ झाली आहे, इंधनाचे भावही वाढले आहेत त्याचप्रमाणे साखरेची पावडर, दोरा,दूध या कच्च्या मालाच्या भावात वाढ झाली आहे तर दुसरीकडे मजुरीचा प्रश्‍न गंभीर आहे. वाढीव दर देऊनही मजुर मिळत नाही यामुळे हा उद्योग करण्यासाठी अडचण येते. मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून हा पारंपारिक उद्योग असल्याने आम्ही हा उद्योग टिकवून ठेवला आहे असे चंद्रकांत शिरजोशी यांनी सांगितले. पांढऱ्याशुभ्र गाठ्या हे आमच्या गाठ्यांचे वैशिष्ट्ये आहे. वीस ग्रॅमपासून ४०० ग्रॅमपर्यंत एक गाठी असते, दररोज ७० ते ८० किलो माल तयार होतो, असेही श्री.शिरजोशी यांनी नमूद केले.

''गेल्या १५ ते २० वर्षांपासून आमचे कुटुंब या व्यवसायात आहे मात्र दोन वर्षांपासून या व्यवसायाला कोरोनाचा फटका बसत असल्याने हा उद्योग अडचणीत आला आहे. राबराब राबून रोजंदारीही निघत नाही. बाजारात पाहिजे तसा उठावही नाही.''

-जनार्दन डाके, गाठी उत्पादक, कुंभार पिंपळगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com