उस्मानाबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (ता. २०) जिल्ह्याच्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. बाधित रुग्णसंख्येवर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांना केल्या. ऑनलाइन पद्धतीने पंतप्रधानांनी कोरोना नियंत्रणाबाबत मार्गदर्शन केल्याची माहिती जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी दिली आहे.
जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक हजाराच्या पुढे गेली आहे. तर पहिल्या लाटेतही ५७४ जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, एप्रिल महिन्यात जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट ३८ टक्क्यापर्यंत पोचला होता. आता यामध्ये कमी झाली असून, तो १८ टक्क्यापर्यंत आला आहे. दरम्यान, १० टक्के पॉझिटीव्हीटी झाल्याशिवाय धोका टळणार नाही. त्या अनुषंगाने प्रयत्न करावेत, अशा सूचनाही यावेळी पंतप्रधानांनी केल्या. जिल्ह्यात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या अंतर्गत दुर्धर आजाराने ग्रासलेल्या रुग्णांचा शोध घेतला असून, सुमारे ५९ हजार नागरिकांची नोंद झाली. त्यांच्या लसीकरणासाठी प्रयत्न केले जात असल्याची बाब पंतप्रधान यांच्या निदर्शनास आणून दिल्याचे जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांची आढावा बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आढावा बैठक घेऊन मार्गदर्शन केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची तातडीची बैठक घेतली. यामध्ये त्यांनी विविध बाबींचा आढावा घेतला. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या अंतर्गत जिल्ह्यात ५९ हजार ७८८ व्यक्तींना दुर्धर आजार असल्याचे दिसून आले आहे. त्यातील २४ हजार नागरिकांचे लसीकरणाचा पहिला डोस पूर्ण झाला आहे. उर्वरित ३५ हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याच्या सूचना ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र स्तरावर देण्यात आल्या आहेत. मे महिन्यात १० पेक्षा अधिक ॲक्टिव्ह रुग्ण असणारी १५२ गावे आढळली आहेत. त्यासाठी अशा गावात अधिकाअधिक चाचण्या करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
ग्रामीण रुग्णालयात ३० बेडची सोय
दुसऱ्या लाटेत जिल्हा रुग्णालयात तसेच उपजिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात उपचार झाले. यापुढे तिसरी लाट येण्याच्या पूर्वीची तयारी म्हणून जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात १० बेडची सोय करावी. तसेच ग्रामीण रुग्णालयात ३० बेडची सोय करण्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही यावेळी जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी आढावा बैठकित दिल्या आहेत. ज्यांना मध्यम लक्षणे आहेत. ऑक्सिजनची पाच लिटरची गरज आहे. त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार मिळावेत. सध्या पॉझिटीव्हीटी रेट १५ टक्के असून ५ टक्के झाल्याशिवाय टेस्टिंग चाचण्या कमी करू नये, असे आवाहनही यावेळी दिवेगावकर यांनी केले.
यावेळी पोलिस अधीक्षक राजतिलक रोशन, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड, अप्पर जिल्हाधिकारी रूपाली आवले, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे आदींची उपस्थिती होती.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.