Navratri : घटस्थापना जलपूजक संस्कृतीचा उत्सव

बियाणांची उगवण क्षमता तपासणारा, पाणीबचतीचाही संदेश देणारा सण
navratri
navratrisakal

औरंगाबाद : नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी सोमवारी (ता.२६) घरोघरी घटस्थापना करण्यात आली. काळ्या मातीच्या मधोमध पाण्याने भरलेला मातीचा घट, त्याभोवती सप्तधान्य टाकून घरोघरी घटस्थापना केली जाते. हा उत्सव आपल्या शेतात पेरण्यात येणाऱ्या बियाणांची उगवण क्षमता तपासून घेण्याचा, पाणी जपून वापरण्याचा संदेश देणारा जलपूजक संस्कृतीचा भाग आहे.

नवरात्राला सोमवारपासून सुरूवात झाली. ज्येष्ठ, आषाढ, श्रावण आणि भाद्रपद असे पावसाळ्याचे दिवस. पावसाळा संपत आला की नवरात्राला सुरूवात होते. नवरात्रातील घटस्थापनेच्या परंपरेविषयी कृषी संस्कृतीचे अभ्यासक उदय देवळाणकर यांनी सांगितले, की हा सण जलपूजक संस्कृतीची जीवनपद्धती आहे. घटस्थापनेसाठी काळी माती पसरून त्याच्या मध्यभागी मातीचा पाणी भरलेला घट ठेवला जातो. घटाभोवती सप्तधान्य टाकले जाते. नऊ दिवस जागरण केले जाते. पाणी हे शेती आणि जीवनपद्धतीशी निगडीत आहे. पावसाळ्यात वाहणारे पाणी साठवा, जमिनीत संरक्षित करा, असा संदेशही हा उत्सव देत असतो.

बियाणांची तपासणी

शेतीमध्ये वापरण्यासाठी पूर्वी घरचेच बियाणे राखून ठेवले जायचे. रब्बी हंगामात पेरण्यासाठी लागणारे बियाणे रब्बी ज्वारी, गहू, मसूर, जवस, करडई, हरभरा, रब्बी भाज्या यांची उगवण क्षमता तपासली जाते. घटातून पाणी झिरपून त्या बियाणांचे अंकुरण होते , त्या बियाणाची उगवण क्षमता कळते. यामुळे ग्रामसंस्कृतीत प्रत्येक घरी हमखास घटस्थापना केली जाते.

सीमोल्लंघनापूर्वी...

श्री. देवळाणकर म्हणाले, की नऊ दिवसाच्या जागरणानंतर सीमोल्लंघन केले जाते. यामागचा संकेत असा आहे की, खरीप हंगामाचे उत्पन्न हाती आलेले असते, हे उत्पादन घेवून इतर कामधंद्यासाठी गावाबाहेर पडणे, आपल्या गावच्या सीमा सोडून देशाटन करणे. मात्र, या सीमा ओलांडून जाण्यापूर्वी पुढच्या रब्बीच्या बियाणाची सोय केली आहे का, रब्बीसाठी पाण्याची सोय केली आहे का? याचा विचार करणे म्हणजे सीमोल्लंघनाचा संकेत. तसेच गावातील नदी, तलाव, विहीरीत पाणी अडवून ठेवा, असे सांगणारा उत्सव, जीवनपदध्तीचा भागही या उत्सवामागचा उद्देश आहे.

पितरांना सहा महिन्यांनी पाणी

अक्षयतृतीयेपर्यंत पाणी संरक्षित करून ठेवण्याच्या अनुषंगाने श्री. देवळाणकर म्हणाले, की नवरात्रानंतर सहा महिन्यांनी उन्हाळ्यात येणाऱ्या अक्षयतृतीयेला (आखाजी) घट बसवले जातात आणि त्या घटातील पाणी पितरांना पाजले जाते. हे पाणी पिल्यानंतर पितरं तृप्त होतात याचा अर्थ असा, आपल्या पूर्वजांना समाधानी ठेवायचे असेल तर पाणी जपून वापरा, पाण्याचा क्षय होणार नाही ते अक्षय राहील म्हणून अक्षयतृतीयेपर्यंत पाणी संरक्षित करा, पाण्याचा अक्षय संचय करा तरच आपली अक्षय सुरक्षा राहील, असा घटपूजनातून संदेश दिला जातो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com