
अर्जुनसिंग याने गाडी पेटवून द्या, काचा फोडा अशी चिथावणीखोर वक्तव्ये करून गाडीच्या समोर ट्रॅक्टर आडवे लावून आरोपींना बाहेर काढून पळवून लावले.
Mumbai Police : वैजापुरात मध्यरात्री मुंबई पोलिसांवर प्राणघातक हल्ला; जमावाकडून लाठ्या-काठ्या, कुऱ्हाडीने मारहाण
वैजापूर : पोलिस भरती प्रकरणात (Police Recruitment Exam) संशयित असलेल्या दोन आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या मुंबई येथील पोलिसांच्या (Mumbai Police) पथकावर जमावाने प्राणघातक हल्ला केल्याचा खळबळजनक प्रकार गुरुवारी (ता. २) मध्यरात्री वैजापूर तालुक्यातील संजरपुरवाडी येथे घडला.
याप्रकरणी ३२ जणांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणणे, खुनी हल्ला करणे, पोलिसांचा मार्ग अडवून आरोपींना पळवणे या आरोपाखाली गुन्हा नोंदवण्यात आला असून यातील काही आरोपींना पोलिसांनी गजाआड केले आहे.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई (पुर्व) येथील दहिसर पोलिस ठाण्यात (Dahisar Police Station) पोलिस भरती परीक्षेतील गैरप्रकाराबाबत गुन्हा दाखल असून या प्रकरणात जनकसिंग सिसोदे, (रा.नागोणीची वाडी), संतोष गुसिंगे (रा.पैठण) हे आरोपी आहेत.
या प्रकरणाच्या तपासकामी व आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिस ठाणे दहिसर येथे कार्यरत सपोनि रणजित थोरात, एम. थोरात, हेड कॉन्स्टेबल एस. किनी, सालकर, जाधव, राजू सांगळे, विनोद चितळकर यांचे पथक नारळी बाग, छत्रपती संभाजीनगर येथे असताना हे दोन्ही आरोपी त्यांच्या नातेवाईकांकडे संजरपुरवाडी येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

याबाबत मुंबईच्या पोलिसांना वैजापूर पोलिस ठाण्यास भेट देऊन तपासकामी तेथे कार्यरत पोलिसांना घेऊन मध्यरात्री संजरपुरवाडी येथे आरोपींचे नातेवाईक अर्जुनसिंग बम्हनावत यांच्या घरी गेले असता घराच्या बाहेर वेगवेगळ्या कॉटवर पाच ते सहा इसम झोपलेले दिसले.
पोलिस पथकाने तपासकामी आल्याचे सांगत ओळखपत्र दाखवले. मात्र, अर्जुनसिंग बम्हनावत याने शेजारी लोकांना बोलावून लाठ्या काठ्या व कुऱ्हाडीसह ३० ते ३२ लोकांना जमा केले. या जमावाने विनोद चितळकर, सालकर व अन्य पोलिसांना मारहाण केली. त्यानंतर आरोपींना गाडीत बसवून घेऊन जात असताना अर्जुनसिंग याने गाडी पेटवून द्या, काचा फोडा अशी चिथावणीखोर वक्तव्ये करून गाडीच्या समोर ट्रॅक्टर आडवे लावून आरोपींना बाहेर काढून पळवून लावले.
वैजापूर ठाण्यात ३२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
याप्रकरणी चितळकर यांनी फिर्याद दिल्यानंतर अर्जुन त्र्यंबकसिंग बम्हनावत, रुपसिंग रामसिंग गुसिंगे, विठ्ठल गबरु बम्हनावत, लताबाई नारायण जारवाल, धनसिंग गबरु बम्हनावत, पवन त्र्यंबकसिंग बम्हनावत, प्रताप मानसिंग बिघोत, सूरज इंदर बम्हनावत, सागर धनसिंग बम्हनावत, निमा देवचंद जारवाल, ज्योती पवन बम्हनावत, विजय रूपचंद जारवाल, इंदर चंपालाल बम्हनावत, युवराज नारायण जारवाल यांच्यासह अन्य तेरा ते पंधरा अनोळखी व्यक्तींविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.