लातूर: पापड आणि लोणचे आदी छोट्या व्यवसायाची चौकट मोडून बचत गटाच्या महिला आता बांधकाम क्षेत्रात उतरल्या आहेत. पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून व्यवसाय करण्याचे बळ त्यांना महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या महिला महासमृद्धी सक्षमीकरण अभियानातून मिळाले आहे. यातूनच गुरूवारी (ता. तीन) एकाच दिवशी जिल्ह्यात बांधकाम साहित्य विक्रीचे वीस घरकुल मार्ट बचत गटांनी सुरू केले. त्याचे ऑनलाईन उदघाटन झाले. या कार्यक्रमाला ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी हजेरी लावत उपक्रमाचे कौतुक केले.
राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर हे ऑनलाईन कार्यक्रमात सहभागी झाले होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संतोष जोशी व जिल्हा अभियान व्यवस्थापक देवकुमार कांबळे उपस्थित होते. महिला बचत गटांकडून पापड, लोणचे, विणकाम आदी छोट्या व्यवसायांनाच प्राधान्य देण्यात येत आहे. त्यात 'चुल आणि मुल'सारखी परंपरा तयार होऊ लागली. यातूनच नकळत महिला सक्षमीकरणाला मर्यादा येऊ लागल्या. सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी छोट्या व्यवसायाची चौकट मोडण्याची गरज होती. यातूनच श्री. गोयल यांनी महिला महासमृद्धी सक्षमीकरण अभियानाची संकल्पना मांडली.
या अभियानात महिला बचत गटांना मोठ्या व्यवसायासाठी पुढे येण्यासाठी बळ देण्यात आले. यातून बचत गटांनी अनेक नवे व्यवसाय सुरू केले. व्यवसायाच्या या साखळीत पुढचे पाऊल टाकत महिलांनी घर सांभाळण्यापासून घर बांधकाम साहित्याची विक्री सुरू केली आहे. या घरकुल मार्ट संकल्पनेतून गुरूवारी एकाच दिवशी वीस घरकुल मार्टचे उदघाटन ग्रामविकासमंत्री मुश्रीफ यांच्या उपस्थितीत ऑनलाईन करण्यात आले. घरकुल मार्टमुळे ग्रामस्थांना गावातच बांधकाम साहित्य उपलब्ध होऊन बचत गटांना चांगले उत्पन्न मिळणार असल्याचे श्री. कांबळे यांनी सांगितले. यासाठी जिल्हा व्यवस्थापक विपणन वैभव गुराळे, अनिता माने यांच्यासह तालुका अभियान व्यवस्थापक, प्रभाग समन्वयक व उमेदच्या सर्व कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.
गटांकडून नव्या व्यवसायाची कास
महिला महासमृद्धी सक्षमीकरण अभियानात बचत गटांना मोठ्या व्यवसायासाठी पुढे येण्यासाठी बळ देण्यात आले. जागतिक महिला दिनी आठ मार्च रोजी अभियानाची सुरवात झाली. ८ मार्च ते पाच जून या काळात या अभियानात एक हजार १३५ बचत गटांची स्थापना झाली. ७७ ग्रामसंघ, सहा प्रभाग संघ तर ३५ महिला उत्पादक गटांनी नव्या व्यवसायाची कास धरली. यासाठी ६९२ बचत गटांना व्यवसायांसाठी बारा कोटी ३४ लाख रूपयाचे कर्ज वाटप आले. अभियानात बचत गटांनी चौकटीच्या बाहेर जाऊन दहा भाजीपाला विक्री केंद्र, २३ कॅन्टीन व एक व्यायाम शाळा सुरू केली. कोरोनाच्या काळात साठ हजार मास्कची निर्मिती त्यांच्या विक्रीतून नऊ लाख ९५ हजार रूपये मिळवल्याचे श्री. कांबळे यांनी सांगितले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.