आष्टी (जि.बीड) : नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आष्टी मतदारसंघातील आष्टी, पाटोदा व शिरूर या तीनही तालुक्यातील जनतेने राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेस या महाविकास आघाडीला कौल दिला आहे. परंतु, काही विरोधक खोटे बोल पण रेटून बोल याप्रमाणे जनतेला दिशाभूल करणारे आकडे सांगून सर्वच ग्रामपंचायती आमच्या ताब्यात आल्याचे सांगत आहेत. विरोधकांचे हे दावे जनतेची दिशाभूल करणारे असून आष्टी मतदारसंघात विरोधकांना काहीही दिसले की माझेच व मीच केले असे, असे म्हणायची सवय लागली असल्याची टीका, आ. बाळासाहेब आजबे यांनी आ. धसांचे नाव न घेता केली.
मंगळवारी (ता. १९) आयोजित पत्रकार परिषदेत आजबे म्हणाले, ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींचे नवनिर्वाचित सदस्य आपणास भेटण्यासाठी आले होते. यातील बहुतांश सदस्य हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मानणारे, तर काही महाविकास आघाडीतील घटक पक्षाला मानणारे आहेत. त्यामुळे सहाजिकच मतदारसंघात भाजपपेक्षा महाविकास आघाडीचे ग्रामपंचायत सदस्य जास्त संख्येने निवडून आले आहेत. विरोधक मात्र खोटे बोलत आहेत. त्यांचे आकडे हे जनतेची दिशाभूल करणारे आहेत.
खोटे बोल पण रेटून, असे विरोधकांचे वर्तन असून शहरी व ग्रामीण भागामध्ये भारतीय जनता पार्टीबाबत जनतेमध्ये नकारात्मक भूमिका तयार झालेली आहे. त्यामुळे मतदारसंघातील जनताही महाविकास आघाडीच्या बाजूने उभी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बहुतांश ग्रामपंचायतींचे नवनिर्वाचित सदस्य माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांचा सत्कार केला आहे. त्यामुळे विरोधकांनी कितीही खोटे दावे केले तरी मतदारसंघात ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेस या महाविकास आघाडीलाच जनतेने कौल दिला असल्याचेही आमदार बाळासाहेब आजबे म्हणाले.
Edited - Ganesh Pitekar
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.