बीड - जिल्ह्यात या वर्षी सात लाख 21 हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली होती. पेरणीनंतर पिके उगवून आल्यावर तब्बल दोन महिने पावसाने दडी मारली. परिणामी, खरीप पिकांची वाढ खुंटली होती.
अक्षरशः दुष्काळजन्य परिस्थिती ओढावली होती; मात्र यानंतर पोळ्याच्या सणापासून जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले. यानंतर सातत्याने अधूनमधून पाऊस झाला. शेवटच्या टप्प्यात तर अतिवृष्टीची नोंद झाली. यामुळे एकीकडे पावसाची टक्केवारी शंभरावर पोचली, तरी सुरवातीला पावसाचा अभाव अन् नंतर अतिवृष्टी यामुळे दोन्ही परिस्थितीत खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. यामुळे अपेक्षेप्रमाणे या वर्षी खरीप पिकांच्या उत्पादकतेत मोठी घट झाल्याचा निष्कर्ष कृषी विभागाने पीककापणी प्रयोगांवरून काढला आहे.
जिल्ह्याच्या खरिपाच्या सर्वसाधारण क्षेत्रापेक्षाही जास्त क्षेत्रावर म्हणजेच तब्बल सात लाख 21 हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली. पिकांच्या पेरणीनंतर सुमारे दोन महिने पाऊसच न झाल्याने पिकांची वाढ खुंटली. यामध्ये कमी कलावधीच्या मूग व उडीद पिकांना सर्वाधिक फटका बसला. कापसाचीही वाढ खुंटली. यानंतर जिल्ह्यात पावसाने पुनरागमन केले. यामुळे पिकांना नवीसंजीवनी मिळाली; मात्र सातत्याने पाऊस पडतच गेला. काही वेळा तर अतिवृष्टी झाली. पिके काढण्याच्या वेळी व काढणीनंतर पावसाने गाठल्याने पिकांचे बाजरी, सोयाबीन, मूग, उडीद आदी पिकांचे नुकसान झाले. त्यातच ऐन वेचणीच्या सुरवातीलाच पाऊस झाल्याने कापूस भिजला.
|