भविष्यात पुतण्याच आमदार क्षीरसागरांचा राजकीय वारस

भविष्यात पुतण्याच आमदार क्षीरसागरांचा राजकीय वारस

बीड - एका पुतण्याने करंगळी सोडली असली तरी आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्या आणखी एका पुतण्याचे राजकीय लॉचिंग धडाक्‍यात झाले आहे. इकडे जयदत्त क्षीरसागरांची दोन्ही मुले व्यवसायात स्थिरावलेली असल्याने पुतणे डॉ. योगेश भारतभूषण क्षीरसागर हेच त्यांचे राजकीय वारस असतील, असे जाणकारांचे मत आहे.

दिवंगत केशरबाई क्षीरसागर यांनी जिल्ह्यात राजकीय अस्तित्व तयार करून शेवटपर्यंत टिकविले. दुसऱ्या पिढीतही त्यांची थोरले चिरंजीव जयदत्त क्षीरसागर विधानसभेत आहेत. दुसऱ्या क्रमांकाचे रवींद्र क्षीरसागर हे गजानन कारखाना आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती, तिसरे चिरंजीव डॉ. भारतभूषण क्षीरसागर बीड नगरपालिका आणि धाकटे डॉ. विठ्ठल हे वैद्यकीय क्षेत्रात आहेत. तिसऱ्या पिढीत रवींद्र क्षीरसागर यांचे चिरंजीव संदीप क्षीरसागर यांनी 

पंचायत समिती सभापती म्हणून राजकीय सुरवात करत नंतर जिल्हा परिषदेतही सभापती म्हणून काम केले. क्षीरसागरांच्या घरात मागच्या दहा महिन्यांपर्यंत जणू सामोपचाराने राजकीय वाटण्याच होत्या. जयदत्त क्षीरसागर हे विधिमंडळात, तर भारतभूषण हे पालिका क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यामुळे दोघेही एकमेकांच्या कार्यक्षेत्रात फारसा हस्तक्षेप करत नाहीत. केवळ आमदार म्हणून जयदत्त क्षीरसागर हे पालिकेच्या विकासकामांच्या उद्‌घाटनाला आणि कामे मंजूर करून देण्यास मदत, अशी भूमिका निभावतात. पूर्वी रवींद्र क्षीरसागरही पालिका हद्दीत लक्ष देत नसत. त्यांचे चिरंजीव संदीप क्षीरसागर राजकीय फडात उतरल्यानंतर त्यांनीही आपले ‘लक्ष्य’ ग्रामीण भागातच केंद्रित केले; पण हळूहळू शहरातही लक्ष घालण्यास सुरवात केल्यानंतरच माशी शिंकल्याचे बोलले जाते. अखेर संदीप क्षीरसागर यांनी आपली स्वतंत्र वाट पकडली. पालिका निवडणुकीपासून संदीप क्षीरसागर यांनी वेगळा मार्ग शोधताच डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांचे चिरंजीव डॉ. योगेश हे शहरात अधिकच सक्रिय झाले. त्यांची पालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणूनही निवड झाली.

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारातही ते ग्रामीण भागात चांगलेच सक्रिय राहिले. या निवडणुकीत जयदत्त क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली चांगले यश मिळाल्याने या यशातील श्रेयाचा वाटा साहजिकच डॉ. योगेश क्षीरसागर यांनाही गेला. त्यातच त्यांचा वाढदिवस नेहमीपेक्षा अधिकच धूमधडाक्‍यात साजरा झाला आहे.

शहरासह मतदारसंघात कार्यक्रमांची रेलचेल आणि होर्डिंग झळकल्याने भविष्यात ग्रामीण भागाची धुरा त्यांच्याकडेच जाईल, असे गणित मांडले जात आहे. तसे, जयदत्त क्षीरसागरांची  दोन्ही मुले आपापल्या व्यवसायात स्थिरावलेली असून राजकीय परिघापासून ते अद्याप तरी दूरच असतात. त्यामुळे त्यांचा राजकीय वारसा पुतणे डॉ. योगेश क्षीरसागरांकडेच जाईल, असे मानले जाते. डॉ. योगेश क्षीरसागर हे आता राजकीय शस्त्रक्रिया कशी करतात, यावर त्यांचे राजकीय भविष्य ठरेल.

उच्चशिक्षित घराणे
क्षीरसागरांच्या दुसरी आणि तिसरी पिढी राजकारणात असली तरी सर्वच उच्चशिक्षित आहेत. जयदत्त क्षीरसागर हे मेकॅनिक इंजिनियर, तर त्यांची मुले हर्षद व रोहित हेदेखील उच्चशिक्षित आहेत. डॉ. भारतभूषण क्षीरसागर हेही होमिओपॅथीचे पदवीधर आहेत. त्यांच्या पत्नी लेखिका आणि प्राचार्या आहेत. धाकटे डॉ. विठ्ठल हे अस्थितज्ज्ञ आहेत. तिसऱ्या पिढीत संदीप क्षीरसागर हे पदवीधर, तर त्यांचे धाकटे बंधू उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर हेदेखील अन्नतंत्र शाखेचे पदवीधारक आहेत. भारतीय प्रशासन सेवेची त्यांची संधी थोडक्‍या गुणांनी हुकली. डॉ. योगेश क्षीरसागर हेदेखील मूत्रविकार आणि किडनी विकार तज्ज्ञ आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com