परळी वैजनाथ (जि.बीड) : तालुक्यात बर्ड फ्ल्युचा शिरकाव झाला असून रामेवाडी येथील पाचशे कोंबड्या नष्ट केल्या आहेत. जिल्हाधिकारी जगताप यांनी तीन गावांत संक्रमित क्षेत्र, तर तेरा गावांत खबरदारीचा उपाय म्हणुन सतर्क क्षेत्र घोषित केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात बर्ड फ्ल्युची लागण वाढत आहे. या रोगापासून तालुका अद्याप दूर होता. परंतु, रामेवाडी येथील तुकाराम कुकडे यांच्या शेडमधील काही कोंबड्यांचा अचानक मृत्यू झाल्यानंतर त्यांची तपासणी केली असता त्यांना बर्ड फ्ल्युची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर जिल्हाधिकारी आर.एस.जगताप यांनी रामेवाडीपासून एक किलोमीटर परिसरातील रामेवाडी तांडा, जळगव्हाण शिवारात प्राण्यातील संक्रमक व नैसर्गिक रोगप्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ अंतर्गत संक्रमित क्षेत्र घोषित केले. तर पोहनेर, डिग्रस, रामनगर तांडा, हिवरा, गोवर्धन, हिवरा वस्ती, पिंपरी, तेलसमुख, बोरखेड, ममदापुर, कौडगाव हुडा, कौडगाव हुडा तांडा व माजलगाव तालुक्यातील कोथाळा आदी गावांना सतर्क क्षेत्र घोषित करत या गावांतील कुकुटपक्षांची खरेदी-विक्री, वाहतुक, बाजार व जत्रा, प्रदर्शनास बंदी घालण्यात आली आहे.
जळगव्हाण येथील ५०० कोंबड्या नष्ट
तालुक्यातील जळगव्हाण येथील कुकुटपालक तुकाराम कुकडे यांच्याकडे असलेल्या कोंबड्यांना बर्ड फ्ल्युची लागण झाल्याने त्यांच्याकडील ५०० कोंबड्या नष्ट करण्यात आल्या आहेत. तालुक्यात बर्ड फ्ल्युचा शिरकाव झाल्याने कुक्कुटपालकांवर संकट उभे राहिले आहे.
संपादन - गणेश पिटेकर
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.