जालना : गेल्या अनेक वर्षाच्या खंडानंतर भारतीय जनता पक्षाला केंद्रात स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे त्यांना देशातील जटील प्रश्न मार्गी लावण्याची चांगली संधी होती, पंरतू त्यांनी केवळ घोषणाबाजी करून लोकांची दिशाभूल केली आणि मूळ प्रश्नांना बगल दिल्याची टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. राज्यात शिवसेना गोंधळून गेल्याचा आरोपही त्यांनी केला.
राज ठाकरे पक्षाच्या बांधणीसाठी मराठवाड्यातील विविध जिल्ह्यात मेळावे घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. आज (रविवारी ता.22) त्यांनी जालन्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तत्वपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजप व शिवसेनेच्या दुटप्पी धोरणावर सडकून टीका केली.
ठाकरे म्हणाले, चार वर्षापूर्वी सत्तेवर आलेले नरेंद्र मोदी सरकार स्वच्छ भारत, जीएसटी आदीबाबत वेगवेगळ्या घोषणा करीत आहे. त्यांच्या मतदार संघातील एक नदी स्वच्छ करू शकले नाहीत, ते मात्र स्वच्छ भारतची घोषणा करीत आहे. पुरेसे पाणी आणि वीज उपलब्ध करून दिल्याशिवाय हागणदारीमुक्तीच्या घोषणेला काय अर्थ आहे? देशात लोकसंख्येचा भस्मासुर वाढत आहे. भाजपकडे बहुमत असल्यामुळे या व अन्य प्रश्नांची त्यांना सोडवणूक करता आली असती, पंरतू सरकार त्यावर काहीही करायला तयार नाही. केवळ घोषणाबाजी करून मुळ प्रश्नांना बगल दिल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
शिवसेना गोंधळलेल्या अवस्थेत
राज्यात शिवसेना गोंधळलेल्या अवस्थेत आहे. काय करावे हेच त्यांना काही कळेनासे झाले आहे, असे एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केवळ घोषणा करून लोकांना दिशाभूल करतात. मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतानाही ते या अनुषंगाने वेगवेगळ्या घोषणा करून दिशालाभूल करतात. ते केवळ थापा मारणारे मुख्यमंत्री असल्याचे ते म्हणाले.
वाळवंट होण्याकडे महाराष्ट्राची वाटचाल
इस्त्रोच्या अहवालानुसार राजस्थाननंतर महाराष्ट्र वाळवंट होण्याकडे मार्गक्रमण करीत आहे. राज्यात 44 टक्के वाळंवंट झाला आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री फडणवीस मात्र 1 लाख 20 हजार विहिरी बांधल्याचे सांगत आहेत. त्या विहिरी नेमक्या कुठे आहेत, हे मात्र ते सांगायला तयार नाहीत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.