औरंगाबाद - गेल्या अनेक दशकांपासून असलेले शिवसेना-भाजप या दोन्ही पक्षांतील नाते पूर्वीसारखे राहिले नाही. त्यामुळे दोघांनाही त्रास होणारच; मात्र आता युती नसल्याचे वास्तव स्वीकारून विजयाची घोडदौड करावीच लागणार आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप मोठ्या ताकदीने उतरून यापूर्वीपेक्षाही अधिक यश संपादन करील, असा विश्वास राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.
मराठवाडा शिक्षक मतदारसंघातील भाजप पुरस्कृत महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे उमेदवार प्रा. सतीश पत्की यांच्या प्रचारार्थ शनिवारी शिक्षक मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला मार्गदर्शन केल्यानंतर पंकजा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, ""जिल्हा परिषद आणि शिक्षक मतदारसंघात मराठवाड्यात चांगली परिस्थिती आहे. भाजपची कार्यकर्ता म्हणून आणि कोअर कमिटी सदस्य म्हणून पक्ष देईल ती जबाबदार समर्थपणे पेलणे माझे कर्तव्य आहे.
उमेदवार जाहीर होतीलच; पण मी पूर्वीपासूनच प्रचार सुरू केला आहे.'' युतीसंदर्भात झालेला निर्णय स्वीकारून आम्ही पुढे जात आहोत.
शिवसेना-भाजप युतीत आता पूर्वीसारखे नाते नसल्याने दोन्ही बाजूंनी वेदना होतात. नवीन पिढीने घेतलेला नवीन निर्णय स्वीकारावा लागणार हे वास्तव आहे. वेळ न दवडता मनाला झालेले दु:ख बाजूला ठेवून विजयाची घोडदौड करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
|