पंधरा दिवसांपासून बोरी गावात निर्जळी

ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप
Bori village water scarcity
Bori village water scarcitysakal

बोरी : येथील ग्रामपंचायतीच्या गलथान कारभारामुळे ग्रामस्थांना पंधरा-वीस दिवसांपासून निर्जळीचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, करपरा मध्यम प्रकल्पात पाणी असतानाही बोरी हे गाव सोळा गाव पाणी पुरवठा योजनेतून वगळण्यात आले आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सोळा गाव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत बोरी येथे निवळी येथील करपरा मध्यम प्रकल्पाच्या जलाशयातून गेल्या वर्षापर्यंत पाणीपुरवठा केला जात होता. परंतु, वीज बिल भरण्यामुळे कधीही ही योजना बंद होत असल्यामुळे ग्रामपंचायतीने ठराव मंजूर करून नवीन ‘जलजीवन’ पाणी पुरवठा योजनेसाठी शिफारस केली. तसेच ग्रामपंचायतीकडून गावात सार्वजनिक पाणीपुरवठ्यासाठी तीन नवीन विहिरींचे काम सुरू आहे. गावात दोन हजार पाचशेहून अधिक ग्रामस्थांना ग्रामपंचायतीने नळजोडण्या दिल्या आहेत. त्यातही अनेकांनी अनाधिकृत नळजोडण्या घेतल्या असून, याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

ग्रामपंचायतीकडून गावात तीन प्रकारच्या नळजोडण्या देण्यात आल्या आहेत. यात घरगुती, मध्यम व व्यावसायिक या नळजोडण्यांचा समावेश आहे. तीन प्रकारच्या नळजोडणीसाठी विविध कर आकारणी करण्यात आली आहे. नळपट्टीच्या माध्यमातून ग्रामपंचायतीला लाखो रुपयांचा महसूल मिळत आहे. ग्रामपंचायतीकडून नळपट्टी घेतली जात असूनही ग्रामस्थांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे.

जून महिना सुरू असूनही पावसाने पाठ फिरविली आहे. सध्या गावातील विहिरींची पाणी पातळी कमी झाली असल्याने पाणी टंचाईने उग्र रूप धारण केले आहे. यामुळे बोरीतील ग्रामस्थ पाण्यासाठी हैराण झाले आहेत. पाण्यासाठी एक ते दोन किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. ज्या बोअरला पाणी आहे, तेथे मोठमोठ्या रांगा लागत आहेत. पाणीटंचाईमुळे ग्रामस्थांना एक हजार लिटर पाण्यासाठी ३०० ते ४०० रूपये मोजावे लागत आहेत.

पाणीपट्टी वसुलीची मोहीम ग्रामपंचायतीकडून यशस्वीपणे राबविली जाते. मात्र, सुरळीत पाणीपुरवठा करण्यात ग्रामपंचायत प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे. पाणीटंचाईस केवळ ग्रामपंचायतीच्या गलथान व नियोजन शून्य कारभारामुळे सामोरे जावे लागत असल्याचा आरोप ग्रामस्थांतून होत आहे.

गावातील पाणी पुरवठा योजनेच्या दुष्काळ विहिरीची पाणी पातळी कमी झाल्याने काही दिवसांपासून गावात पाणी पुरवठा सुरळीत नाही. परिणामी, ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. बोरी गावासाठी नविन जलजीवन योजना मंजूर झाली आहे. नविन पाणी पुरवठा योजना कार्यान्वित झाल्यानंतर गाव पाणीदार होईल.

-- बी.आर. देशमुख, ग्रामसेवक, बोरी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com