भाऊराव बनले जनावरांचे पालनकर्ता

फोटो
फोटो

आखाडा बाळापूर (जि. हिंगोली): परिसरातील शेतकऱ्यांचा कल यांत्रिकीकरणाकडे वाढला असून चारा टंचाइ मुळे जनावरे पाळताना पशु पालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे जनावरे विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. खरेदीसाठी व्यापारीच पुढे येत असून ही जनावरे कत्तलखान्याला नेत आहेत. मात्र, कळमनुरी तालुक्यातील घोडा येथील शेतकरी भाऊराव देशमुख यांनी कत्तलखान्याकडे विक्रीला जाणारी जनावरे विकत घेवून सांभाळ करण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे जनावरांना जीवदान मिळत असून त्याच्या उपक्रमाचे कौतूक होत आहे.

कळमनुरी तालुक्‍यातील घोडा येथील भाऊराव बाजीराव देशमुख (वय ५५) हे शेतकरी स्‍वतःची शेती करतात. त्‍यांना गाय, बैल, म्‍हैस या जनावरांविषयी प्रचंड आस्‍था आहे. श्री. देशमुख यांना कत्तलखान्याकडे जनावरे विक्री करण्याचा प्रकार खटकला. त्‍यांनी त्‍यांच्‍या भागातील जनावरे कत्तलखान्याकडे जाण्याचे रोखण्याचे ठरविले. जनावरे कत्तलखान्याकडे जात असल्‍याची माहिती कळताच ते तेथे जावून तत्‍काळ जनावरे खरेदी करतात. या जनावरांचा स्‍वतः सांभाळ करतात. आज घडील श्री. देशमुख यांच्‍याकडे चाळीस गाई, तीस बैल आहेत. त्‍यांनी सत्तर जनावरांना कत्तलखान्याकडे जाण्यापासून थांबवून या जनावरांना जीवदान दिले. या गाईपासून दररोज चाळीस लिटर दुध उत्‍पादन मिळत असून हे दुध आखाडा बाळापूर येथे विक्री करतात. जनावरांप्रति असलेला आदर किती आहे, हे त्‍यांनी केलेल्‍या कार्यातून दिसून येत आहे.

समाजोपयोगी कामातही अग्रेसर

गावातील ज्‍या मुलीला आई वडील नाहीत, त्‍या मुलीच्‍या विवाह सोहळ्यासाठी ते एक क्‍विंटल गहू मोफत देतात. जनावरांसाठी सार्वजनिक पाण्याचा हौद बांधणाऱ्या गावकऱ्यास पाचशे रुपयांची आर्थिक मदत करतात. तसेच आखाडा बाळापूर परिसरात रस्‍त्‍याने फिरणाऱ्या मनोरुग्‍णांना स्‍नान घालून दाढी कटींगवर खर्च करतात. विविध सामाजिक कामासह कत्तलखान्याकडे जाणाऱ्या जनावरांना जीवदान देणारे भाऊराव देशमुख यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

चारा टंचाइने पशुपालक त्रस्त

जिल्ह्यात तीन ते चार वर्षांपासून उन्हाळ्यात पाणी, चारा टंचाइला सामोरे जावे लागत आहे. यावर्षी परतीच्या पावसाने दिलासा दिला असता तरी चार वर्षांत चारा उपलब्ध करताना पशुपालकांना चांगलेच मेटाकुटीला आले होते. चाऱ्याचे भाव गगनाला भिडल्याने जनावरे पाळताना मोठा खर्च करावा लागत होता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी नाविलाजाने जनावरे विक्री करावी लागली आहेत.

जनावरे कत्तलखान्याकडे विक्री करू नयेत

जनावरे पाळणे हे सद्य स्‍थितीत दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. यांत्रिकीकरणामुळे शेतीकामे जनावरांकडून होत नाहीत. बाजारात किंवा कत्तलखान्यात जनावरांची विक्री होते. हा प्रकार मन हेलावून गेल्‍याने पाच वर्षात कत्तलखान्याकडे जाणारे जनावरे विकत घेवून त्‍याचा सांभाळ केला. शेतकऱ्यांनी जनावरे कत्तलखान्याकडे विक्री करू नयेत.
भाऊराव देशमुख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com