उस्मानाबाद - साखर कारखानदारांच्या वाढत्या अन्यायामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. सांजा (ता. उस्मानाबाद) येथील शेतकऱ्यांनी फडातील ऊस पेटवून देण्याचा निर्णय घेतला असून, या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे निमंत्रणच त्यांनी थेट कारखानदार, जिल्हा प्रशासनाला दिले.
दुष्काळातही शेतकऱ्यांनी वाढवलेला ऊस कारखानदार घेऊन जात नसल्याचे वाळून जात आहे. ऊसतोडीसाठी टोळी चालकांकडूनही अडवणूक करण्यात येत आहे. ऊसतोड, वाहतुकीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या आर्थिक मागण्या होत आहेत. शेतात ऊस पडून राहू नये यासाठी काहींनी या मागण्या पूर्णही केल्या आहेत. त्यामुळे टोळीचालकांची अपेक्षा वाढतच जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
दुसरीकडे सभासदांची ठरलेली तारीख येऊनही बिगर सभासदाचा ऊस स्वीकारण्याचे काम कारखानदार करत आहेत. दुष्काळाची तीव्रता वाढत जात असताना यापुढे ऊस टिकणे अवघड आहे. वाळलेल्या उसाचे वजन कमी होते, उताराही कमी मिळतो. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळेच शेतकरी उसाचा फड पेटवून देण्याची भाषा करू लागले आहेत. या गावातील हताश झालेल्या सुमारे पंचवीस शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन, 24 जानेवारीला दुपारी एक वाजता ऊस पेटवून देणार असून, उपस्थितीचे निमंत्रणच दिले आहे.
कारखानदार, टोळीचालकांच्या मनमानी कारभाराला वैतागून गावातील आम्ही काही शेतकऱ्यांनी गुरुवारी (ता. 24 ) दुपारी उसाचा फड पेटवून देण्याचा निर्णय घेतला आहे. या वेळी जिल्हा प्रशासनासह कारखानदारांनी उपस्थित राहावे, असे निमंत्रण देणारे निवेदन त्यांना देण्यात आले आहे.
- नामदेव नायकल, शेतकरी, सांजा
|