लातूर - शेतकऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी भावाने शेतमाल विकू नये; तसेच हमीभावापेक्षा कमी दराने व्यापाऱ्यांनी माल खरेदी करू नये. तसे केल्यास त्या व्यापारी व अडत्यांवर त्यांचे लायसन्स रद्द करण्याची कारवाई बाजार समित्यांनी करावी, असे निर्देश सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले आहेत.
येथे गुरुवारी झालेल्या लातूर विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
राज्यातील सर्व बाजार समित्यांनी शेतमाल तारण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी, याकरिता शासन मागील दोन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करीत आहे; परंतु बाजार समित्या व व्यापारी यांचे संगनमत असल्याने बहुतांश बाजार समित्यांनी ही योजना सुरू केलेली नाही. अशा सर्व बाजार समित्यांवर कारवाईचा इशारा देशमुख यांनी दिला.
शेतमाल तारण योजनेअंतर्गत 2018-19 साठी लातूर विभागासाठी दोन लाख शेतकरी व दहा लाख क्विंटल शेतमाल तारण ठेवण्याचे उद्दिष्ट पणन मंडळाकडून ठरविण्यात येत आहे. त्याबाबतचे योग्य नियोजन राज्य पणन मंडळाच्या विभागीय अधिकाऱ्यांनी करून प्रत्येक जिल्ह्याला उद्दिष्ट वाटप करावे. ते पूर्ण करण्यासाठी सर्व बाजार समित्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
|