औरंगाबाद - 'आपले जीवन हे आखून घेतलेल्या मार्गावरूनच जाईल, असे नाही. शिक्षण आणि नोकरी करीत असताना आव्हाने बदलत असतात. या वेळी आपला फोकस डळमळीत नसावा, तो स्पष्टच पाहिजे,'' असे मत निशांत तोतला याने नोंदविले.
"सकाळ'च्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कच्या यिन संवाद उपक्रमात निशांत बोलत होता. जेएनईसी आणि यिनतर्फे राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून जेएनईसीच्या आर्यभट्ट सभागृहात बुधवारी (ता. 11) दुपारी कार्यक्रम झाला. 2008 ला आयआयटी जेईईमध्ये देशातून दुसरा आलेल्या निशांतने यिन संवाद कार्यक्रमात आपले अनुभवकथन करीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. निशांत म्हणाला, 'कॉलेजमध्ये असे वाटते, आपला एकच गोल आहे. त्यावरच फोकस केला जातो. सिनिअर्सच्या मागे जाणे हा अनेकदा दृष्टिकोन असतो. या वेळी इतरही मार्ग आहेत, त्याकडे दुर्लक्ष होते. ऍकॅडमिकशिवाय इतर गोष्टींत आवड असल्यास प्राधान्य द्या. कॉलेजचा तीन किंवा चार वर्षांचा काळ हा आयुष्याला कलाटणी देणारा असतो. या काळात अनेक अनुभव येतात, शिकायलाही भरपूर मिळते. कॉलेज जीवनात आपण बॉस असतो. नोकरी प्रत्यक्ष व्यवहाराची जाण करून देते. परफेक्शनला शेवट नसतो, नोकरीत हा पैलू जोपासलाच पाहिजे.''
निशांतने सांगितले, की 'पहिली नोकरी चांगलीच हवी, हा अट्टहास असल्याने अनेकदा कॅम्पस् सिलेक्शनवेळी विद्यार्थ्यांना ताण येतो. त्यामुळे अनेकदा संधी गमाविण्याची वेळ येते. तेव्हा पहिल्या नोकरीतून शिकायला मिळेल; या विचारातून नोकरी स्वीकारायला हवी. यात नोकरी चांगली-वाईट, पगार याला थारा देऊ नये.'' तसेच भारतातील विद्यापीठे थिअरीवर भर देतात, तर अमेरिकेतील कोर्स हाताला काम देणारी आहेत. हा फरक त्याने विद्यार्थ्यांशी शेअर केला.
'आपल्या सवयी कामावर परिणाम करणाऱ्या ठरू शकतात. त्यावर नियंत्रण असले पाहिजे. अमेरिकेतील तरुण हे आपले जीवन स्वतंत्रपणे जगण्यावर भर देतात. कॉलेजस्तरावर छोटी नोकरी करून अनुभव गाठीशी बांधण्याचे प्रयत्न करतात. आपणाला काय करायचे हे तेथील तरुणच ठरवितात. ही मानसिकता तिथे तयार झाली आहे; तसेच शिकत असताना ते प्रश्न विचारायला कधीच कचरत नाहीत. त्यामुळे शिक्षणात सहजता आली आहे,'' असे निरीक्षण निशांतने नोंदविले.
या वेळी जेएनईसीचे डॉ. रवी देशमुख, प्रा. विजया मुसंडे, डॉ. आर. जे. तोतला यांची उपस्थिती होती. यिनचे गृहमंत्री विवेक पवार याने यिनबद्दल माहिती दिली. सूत्रसंचालन आदिती मेठी हिने केले. सिमरन सुरानी हिने आभार मानले.
|